नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती 2023 : Narali Purnima Information In Marathi 2023

Narali Purnima Information In Marathi | 2023 नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती 2023 :– भारतामध्ये धार्मिक संस्कृतीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सण, उत्सव, रूढी, परंपरांनी नात्यांमधील वीण अधिक घट्ट केली आहे. असाच एक श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर रक्षाबंधनाच्या दिवशी येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे आपण वरुणदेवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुणदेवाचा आशीर्वाद मिळवतो. समुद्राविषयी कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर आणि विशेष करून आपले कोळी बांधव भक्तीभावाने पूजाअर्चा करतात.

Table of Contents

नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती : Narali Purnima Information In Marathi

कोळी आणि समुद्र यांचे नाते खऱ्या अर्थाने व्यक्त करणारा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा आहे. पृथ्वीवरील आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी समुद्राचा मोठा वाटा आहे. म्हणून या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते. नारळी पौर्णिमेचा इतिहास, याचे महत्त्व आणि नारळी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते, याबाबतची माहिती आम्ही आज या लेखाद्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूयात नारळी पौर्णिमा माहिती.

नारळी पौर्णिमा कधी आहे ?

सण –नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
इंग्रजी दिवस –३० ऑगस्ट २०२३
हिंदू तिथी –श्रावण शु. पौर्णिमा
धर्म –हिंदू
पूजन –वरुणदेव , समुद्रदेव
वारंवारतावार्षिक

रक्षाबंधन 2023 : यावर्षी 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी आहे रक्षाबंधन, जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती २०२३ : Narali Purnima Information In Marathi २०२३

“सण आयलाय गो आयलाय गो
नारली पुनवेचा,
मनी आनंद मावना
कोल्यांचे दुनियेचा”

नारळी पौर्णिमा गाणे

नारळी पौर्णिमा म्हणजे काय ? What Is Narali Poornima Festival ?

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जास्त प्रमाणात भरती असते आणि अमावास्येला ओहोटी जास्त असते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राने शांत व्हावे आणि त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी समुद्राला श्रीफळ अर्पून प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच कोळी लोक मासेमारी साथी आपल्या होड्या पाण्यात लोटतात.

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात जसे सूर्याचे योगदान आहे तसेच समुद्रदेवाचेही आहे. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

नक्की वाचा👉 भावा – बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण – रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा इतिहास – History Of Narali Purnima In Marathi

एका पौराणिक कथेनुसार हा सण समुद्राचा हिंदू देव वरूण याच्याशी संबंधित आहे. प्राचीन काळी समुद्रकिनारी भागात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता. मच्छीमार अनेकदा लाकडी बोटीतून समुद्रामध्ये जायचे. परंतु पावसाळ्यामध्ये समुद्र हा खवळलेला असतो. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे या काळात कठीण होते. म्हणून वरूण देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मच्छीमार लोकांचा हा मासेमारीचा हंगाम सुरक्षित करण्यासाठी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली, आणि ही प्रथा हळूहळू नारळी पौर्णिमेच्या उत्सवामध्ये रूपांतरीत झाली.

नारळी पौर्णिमा माहिती – धार्मिक

सणाचे नाव – नारळी पौर्णिमा
साजरे करणारे – कोळी बांधव आणि भारतीय लोक
दूसरा सण – रक्षाबंधन, पोवती पौर्णिमा
दूसरा सण – रक्षाबंधन, पोवती पौर्णिमा
धर्म – हिंदू
संबंध – समुद्र
देव – वरुण देव
मराठी महिना – श्रावण
इंग्रजी महिना – ऑगस्ट
नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा अर्थ Narali Purnima Meaning In Marathi

हिंदू कॅलेंडर प्रमाणे आणि शास्त्राप्रमाणे श्रावणामधील पौर्णिमेला समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळाची पौर्णिमा म्हणजेच “नारळी पौर्णिमा” असे म्हटले जाते.

नारळी पौर्णिमेचा मंत्र Narali Purnima Mantra In Marathi

|| ओम वाम वरुणाय नमः ||

पूजा करताना या मंत्राचा जप केल्यामुळे समुद्र आपल्याला प्रसन्न होतो असे म्हटले जाते.

नारळी पौर्णिमेचे महत्व – Importance Of Narali Poornima In Marathi

पावसाळ्यामध्ये समुद्र उसळल्यामुळे मासेमारीसाठी धोका निर्माण होतो. म्हणून श्रावण पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. असे समजले जाते की, वरूण देवाचे वास्तव्याचे ठिकाण हे समुद्र आहे. त्यामुळे समुद्राची कृपा कोळी बांधवांवर राहावी म्हणून त्याची रीतसर पूजा करून वाजत गाजत नारळ अर्पण केला जातो. या दिवशी नारळापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना अतिशय महत्त्व असते.

श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना म्हणून पाळला जातो. त्याचप्रमाणे तीन डोळे असलेला नारळ हे श्रीफळ म्हणून देखील याला महत्त्व आहे. म्हणून याला समुद्रामध्ये अर्पण करताना हळुवारपणे सोडला जातो. या दिवशी वरूण देवाला नारळ अर्पण करून त्याची प्रार्थना केली जाते. त्यामुळे समुद्रामध्ये मासेमारी करताना धोका उद्भवत नाही असा या मागचा समज आहे.

नारळी पौर्णिमा सांस्कृतिक महत्त्व Cultural Importance Narali Purnima In Marathi

या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. यानंतर भारतातील बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी बोटीच्या शर्यती लावल्या जातात. तर काही ठिकाणी नारळ फोडण्याच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. या दिवशी नृत्य, गायनाचा कार्यक्रम देखील केला जातो.

नारळी पौर्णिमा आर्थिक महत्त्वEconomical Importance Narali Paurnima In Marathi

नारळी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जसे आहे, त्याचप्रमाणे या सणाचे आर्थिक महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सामान खरेदी करतात. त्याचप्रमाणे विकतात. म्हणजे नारळ, समुद्राशी निगडित असलेल्या वस्तू इत्यादी.

खास करून महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील लोक हे आपल्या धंद्यामध्ये व्यस्त असतात. कारण या ठिकाणी जास्त करून मच्छीमार बांधव राहत असतात. ते समुद्रातील मासे पकडून बाजारामध्ये विकतात. बहुतेक लोक समुद्राच्या काठी फिरण्यासाठी जात असतात. त्याचप्रमाणे नौका विहार, पोहणे यासारख्या गोष्टी करत असतात.
भारतातील अनेक राज्यांमध्ये नारळी पौर्णिमा हा पारंपारिक उपक्रम आणि कार्यक्रमासह साजरा केला जातो. यामध्ये लोक बोटीच्या शर्यती लावतात. नाचाचे कार्यक्रम घेतात. त्याचप्रमाणे नारळ फोडण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम घेतला जातो. यासाठी बाजारामध्ये खरेदी विक्री चालू असते. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळतो.

ओल्या नारळाची बर्फी : या नारळी पौर्णिमेला बनवा खमंग नारळाच्या वड्या, सोपी रेसिपी आत्ताच वाचा

कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा Fishermen and Narali Paurnima In Marathi

या दिवशी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटींना छान रंगरंगोटी करून पताकांनी सजवले जाते. आणि मासेमारीसाठी या दिवशी समुद्रामध्ये बोटी लोटल्या जातात. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत वाजत गाजत मिरवणुकीने सगळे बंदरावर येतात. या दिवशी कोळी बांधव आपला पारंपारिक वेश परिधान करतात. त्याचप्रमाणे बायका देखील भरपूर दागदागिने घालून हा सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोळीगीते आणि वाद्यांच्या साथीने मिरवणुका निघतात.

नारळाला सोनेरी कागदाचे आवरण लावून सजवलेला असा नारळ समुद्रामध्ये विधी व पुजाअर्चा करुन वाहिला जातो आणि या दिवशी नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कोळी बांधवांच्या सगळ्या बायका या ठिकाणी वरूण देवाची, समुद्राची पूजा करून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या आपल्या धन्याचे रक्षण व्हावे, त्याचप्रमाणे भरपूर मासळी मिळावी, यासाठी गाऱ्हाणे घालतात. अशा पद्धतीने कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा साजरी होते.

नारळी पौर्णिमेचा खेळ Narali Purnima 2023 Marathi

या दिवशी प्रत्येक भागामध्ये नारळी पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे परंपरा देखील आहे. अनेक ठिकाणी या दिवशी नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो. दोन स्पर्धक आपापल्या हातात नारळ घेऊन तो एकमेकांच्या नारळावर आपटून फोडण्याची स्पर्धा असते. ज्या स्पर्धकाकडून नारळ फोडला जातो त्याला बक्षीस म्हणून पुन्हा नारळ दिला जातो.

काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉलसारखा गोळा मारून नारळ फोडण्याची स्पर्धा भरवली जाते. स्पर्धकापासून जवळपास सात ते आठ फुटांवर नारळ ठेवला जातो आणि बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचूक मारून फोडला जातो. या अशा अनोख्या स्पर्धेमुळे सामाजिक एकोपा टिकून राहतो.

समुद्राची पूजा Worship of Sea in Narali Purnima

मासेमारी करणाऱ्या लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा हा असतो. पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्यामुळे त्या काळामध्ये मासेमारी करण्यास धोका उद्भवतो. त्यामुळे या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असते. नंतर श्रावण महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर समुद्राचा कोप होऊ नये, त्याचप्रमाणे कुठल्याही मच्छीमाराला समुद्रापासून धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या दिवशी समुद्राची पूजा करून वरूण देवाला म्हणजेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केला जातो.

नारळी पौर्णिमा पूजाविधी – Pooja in Narali Purnima

  • या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ आंघोळ केली जाते.
  • यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा केली जाते.
  • यानंतर बोटीची, त्याचप्रमाणे समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो.
  • या दिवशी नारळाच्या पदार्थांना महत्त्व असल्यामुळे नारळापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात.
  • नंतर मच्छिमार लोक आपल्या बोटी समुद्रामध्ये ढकलून समुद्रामध्ये एक फेरी मारतात.
  • याच दिवशी रक्षाबंधन हा सण असतो. त्यामुळे प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते.

नारळी पौर्णिमेबाबत महत्त्वाच्या गोष्टी Important Things of Narali Paurnima

  • हा सण मुख्यतः समुद्रकिनारी राहणारे बांधव आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे.
  • समुद्र शांत होण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून या दिवशी समुद्राची पूजा केली जाते.
  • या पूजेनंतर कोळी बांधव पुन्हा मासे पकडण्यास आणि समुद्रात बोटी ढकलण्यास सुरुवात करतात.
  • नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. यामध्ये भावा बहिणीचे एकमेकांप्रती प्रेम दर्शवले जाणारा हा सण आहे.

नारळी पौर्णिमेची वैशिष्ट्ये Key Features Of Narali Poornima

  • या दिवशी जानवे परिधान करणारे लोक जानवे बदलतात. म्हणून याला पोवती पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.
  • या दिवशी कोणीही मासेमारीला जात नाही तसेच कोणीही मांसाहार करत नाही.
  • हिंदूंच्या सणांमध्ये देवाला नारळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण याला तीन डोळे आहेत आणि याला भगवान शंकरांचे फळ मानले जाते.
  • कोणतेही शुभकार्य करताना तसेच नकारात्मक गोष्टी घडू नयेत यासाठी सर्वप्रथम नारळ फोडला जातो.
  • श्रावण महिना भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे. नारळी पौर्णिमेला, भक्त शिवाची प्रार्थना देखील करतात. कारण असे मानले जाते की, नारळाचे तीन डोळे हे 3 डोळ्यांच्या भगवान शंकराचे चित्रण आहेत.
  • महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण जे ‘श्रावणी उपकर्म’ करतात ते या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य न खाता उपवास करतात. दिवसभर फक्त नारळ खाऊन ते ‘फलाहार’ व्रत करतात.
  • नारळी पौर्णिमेला निसर्ग मातेबद्दल कृतज्ञता आणि आदर म्हणून लोक किनाऱ्यावर नारळाची झाडे लावतात.
  • पूजा विधी पूर्ण केल्यानंतर, मच्छीमार त्यांच्या सुशोभित केलेल्या बोटीतून समुद्रात प्रवास करतात. एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परततात आणि उरलेला दिवस उत्सवात घालवतात. नृत्य आणि गायन हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.

वाचा👉 श्रावणातील पहिला सण – नागपंचमी

नारळी पौर्णिमा का महत्त्वाची आहे? Why Narali Purnima Is Important?

समुद्राकाठी राहणारे मच्छीमार बांधव या दिवशी भगवान वरूण देवांची पूजा अर्चा करून त्यांना नारळ अर्पण करतात. त्यानंतर ते समुद्रात भरपूर मासे मिळावेत आणि समुद्रातील पाण्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करतात. पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर मच्छीमार आपल्या सजवलेल्या बोटी समुद्रामध्ये ढकलतात आणि समुद्रात एक समुद्रातील प्रवासाचा आनंद घेतात. या नारळी पौर्णिमेपासूनच मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते. या दिवशी संपूर्ण कुटुंब, मित्र परिवार नारळी पदार्थांच्या जेवणाचा आनंद घेतात. त्यानंतर गायन, नृत्याचे कार्यक्रम करतात म्हणून हा सण महत्वाचा आहे.

समुद्राला नारळ का अर्पण करावा?Offering Coconut to Sea in Narali Purnima

हिंदू संस्कृतीमध्ये त्याचप्रमाणे धार्मिक संस्कृतीमध्ये नारळाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. नारळाला “श्रीफळ” असे देखील म्हटले जाते. श्री म्हणजे “लक्ष्मी” आणि फळ म्हणजे “नारळ”. नारळाच्या विविध प्रकारच्या गुणांमुळे त्याला हिंदू धर्मामध्ये पवित्र असे स्थान आहे. त्याचप्रमाणे नारळाला तीन डोळे असल्यामुळे भगवान शंकराचे फळ म्हणून देखील महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या नारळामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. म्हणूनच नारळ म्हणजेच निसर्गाची पूजा म्हणून आपण या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतो.

समुद्राला नारळ अर्पण कसा करावा? – How to Offer Coconut to Sea in Narali Purnima

  • नारळ अर्पण करताना सर्वप्रथम तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन कापडाने कोरडा करावा.
  • यानंतर नारळाला हळद कुंकू आणि अक्षता त्याचप्रमाणे फुल ठेवावे.
  • समुद्रकिनारी जाऊन समुद्राकडे तोंड करून सावकाश पणे नारळ वहावा, नारळ फेकू नये.
  • नारळ अर्पण करताना वरूण देवाची प्रार्थना आणि मंत्र उच्चार करावा.
  • नारळ अर्पण करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही साहित्यामध्ये गुंडाळला नाही याची खात्री केली पाहिजे, कारण यामुळे सागरी प्राणी जीवन धोक्यात येऊ शकते.
  • नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते. परंतु हा नारळ सोडताना तो फेकू नये तर हळुवारपणे समुद्रात सोडावा.
  • काहीजण नारळ अर्पण करताना समुद्रामध्ये फेकतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित लाभ प्राप्त होत नाहीत.

नारळी पौर्णिमा कुठे साजरी केली जाते?Where Narali Purnima Is Celebrated?

  • नारळी पौर्णिमा हा हिंदूंचा मोठा सण आहे. मुख्यतः, हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रातील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी आणि कोकण इत्यादी किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये साजरा केला जातो.
  • नारळी पौर्णिमा हा सण देशभर लोकप्रिय आहे. परंतु विशेषतः महाराष्ट्रात ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा विशिष्ट सण श्रावणी पौर्णिमा, रक्षाबंधन,पोवती पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा अशा इतर नावांनी देखील ओळखला जातो.
  • मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, विसावा, माहीम, सातपाटी चारकोप, मालवणी, वाशी, सारसोळे इत्यादी ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळते.

नारळी पौर्णिमा मुहूर्त, तारीख आणि तिथी Narali Purnima Muhurat

नारळी पौर्णिमा हा यावर्षी ३० ऑगस्ट २०२३ बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे.

  • पौर्णिमा तिथी आरंभ – ३० ऑगस्ट सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू.
  • पौर्णिमा तिथी समाप्त –३१ ऑगस्ट सकाळी ०७ वाजून ०५ मिनिटांनी समाप्त.

नारळी पौर्णिमेचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ – Narali Purnima Marathi

नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष असे महत्त्व आहे. ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात नारळी वड्या यासारखे गोड पदार्थ या दिवशी केले जातात. नारळाच्या विविध पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नारळी पौर्णिमेची कथा – Story Of Narali Purnima

एका पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला होता. जो खूप वर्ष चालला होता. तलाव, नद्यांमधील पाणी आटले होते. लोकांची उपासमारी होत होती. त्यामुळे दुःखी झालेल्या जनतेने समुद्र देवता असलेल्या वरूण देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रार्थनेने वरूणदेव प्रसन्न झाले. आणि त्यांची मदत करण्याचे वचन दिले. त्यानंतर वरूण देवांनी समुद्रातील सगळ्या प्राण्यांना पवित्र पाण्याचे भांडे आणण्याची आज्ञा दिली. ते पवित्र पाण्याचे भांडे त्यांनी महाराष्ट्रातील नद्या, तलावांमध्ये ओतले. या पवित्र पाण्याने जमिनीवरील जीवन आणि सुपीकता आली. दुष्काळ संपून सुखी जीवन सुरू झाले. त्यामुळे जनतेने वरूण देवाचे आभार मानले.

त्याचवेळी या जनतेने नारळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान वरूण देवाचे आभार मानण्याचा दिवस आम्ही साजरा करू असे घोषित केले. म्हणूनच या दिवशी लोक समुद्रदेवतेची पूजा करतात. आणि त्यांना नारळ अर्पण करतात. ज्यामुळे आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि समुद्रापासून आपल्याला संरक्षण मिळते.

तळकोकणातील नारळी पौर्णिमा आणि नारळ लढवणे – Coconut Fight In Narali Purnima

तळकोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळी पौर्णिमा हा उत्सव जरा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. परंपरेप्रमाणे घरातील पूजा, समुद्रदेवतेची पूजा आणि समुद्राला नारळ अर्पण करणे, याबरोबरच नारळ लढवणे – म्हणजेच नारळाची लढाई हा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ इथे खेळला जातो.

गावागावातली अगदी शाळकरी मुलांपासून ते सत्तरीपर्यंतचे म्हातारे पुरुष या सणाच्या आधी महिनाभर घट्ट आणि कठीण करवंटी असले नारळ शोधु लागतात. नारळ लढवण्यासाठी तयारी करणारे पुरुष लांब लांबच्या गावात फिरून, अनुभवाप्रमाणे टिचकी मारून, घट्ट करवंटी असलेले नारळ निवडून ठेवतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरातील पूजा आटोपल्यानंतर सगळेजण देवळात जमतात.

नारळ लढवणे

  • देवळांमध्ये किंवा देवळाच्या पटांगणामध्ये, एका ठराविक पद्धतीत उजव्या हातात नारळ उभा धरून त्याचा प्रतिस्पर्ध्याच्या नारळावर आघात केला जातो.
  • मग प्रतिस्पर्धी आपल्या नारळाचा सुद्धा तशाच प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या नारळावर आघात करतो.
  • या आघातांमध्ये कोणताही एक नारळ फुटतो. फुटलेला नारळ हा फोडणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
  • अशाप्रकारे आपल्याकडील नारळ जेवढा कठीण असेल तेवढे आपण इतर प्रतिस्पर्ध्यांचे नारळ फोडून आपल्याकडे जास्तीत जास्त नारळ जमा करू शकतो.
  • ही नारळ लढवण्याची परंपरा गेल्या काही वर्षात बाजारांच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते.
  • येथे 50-100 -200 -500 अशा पटीत नारळ विकत घेतले जातात. छोटे विक्रेते अशी नारळांची रास मांडून ठेवून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना विकतात.
  • त्यानंतर नारळ लढाई खेळणारे प्रतिस्पर्धी या मोठ्या राशींमध्ये नारळ लढवतात.
  • हा रोमांचकारी अनुभव पाहण्यासाठी गावोगावी बाजारात अतिशय गर्दी होते.

प्रश्न

नारळी पौर्णिमा का साजरी करतात?

समुद्र शांत होण्यासाठी तसेच समुद्राच्या पाण्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून कोळी बांधव आणि मच्छीमार या दिवशी समुद्राची पूजा करतात.

यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण कोणत्या दिवशी आहे?

यावर्षी नारळी पौर्णिमेच्या सण ३० ऑगस्ट २०२३ बुधवार या दिवशी आहे.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणाची पूजा केली जाते?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरूणदेवाची म्हणजेच समुद्राची पूजा केली जाते.

नारळी पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

नारळी पौर्णिमेला प्राचीन काळापासून किनारपट्टीवरील मच्छिमार समुदायात खूप महत्वाचे स्थान आहे. किनारपट्टीवरील समुदाय सुरक्षित प्रवासासाठी आणि भरपूर मासेमारीच्या हंगामासाठी समुद्राचा आशीर्वाद घेतात. नारळ अर्पण करून समुद्र देवतेचा आशीर्वाद घेतात.

नारळी पौर्णिमेसाठी काही खास पदार्थ तयार केले जातात का?

होय, नारळाची मिठाई, नारळी भात, नारळाची वडी आणि गोड नारळाच्या दुधाचा भात यासारखे पदार्थ सणादरम्यान तयार केले जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो.

नारळी पौर्णिमेला कोणते विधी केले जातात?

मच्छिमार लोक समुद्राजवळ विधीवत नारळ समुद्राला अर्पण करतात, वरुणाची प्रार्थना करतात आणि नारळाच्या झावळ्या पासून सजवलेल्या बोटी पाण्यात उतरवतात. काही ठिकाणी नारळाची लढाई खेळतात. या दिवशी बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात, हे त्यांच्या प्रेमाचे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना यांचे प्रतीक असते

नारळी पौर्णिमा म्हणजे काय?

नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा एक पारंपारिक हिंदू सण असून हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेला प्राचीन काळापासून किनारपट्टीवरील मच्छिमार समुदायात खूप महत्वाचे स्थान आहे.

निष्कर्ष

आमच्या आजच्या नारळी पौर्णिमा या सणाबाबतच्या नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती या लेखामध्ये आम्ही सणाचा इतिहास – History Of Narali Purnima , याचे महत्त्व – Importance Of Narali Purnima, याची वैशिष्ट्ये यांची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपणास ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

संदर्भ –

नारळी पौर्णिमा माहिती 

नारळी पौर्णिमा सणाची माहिती 

Leave a comment