Rani Laxmibai Information In marathi : राणी लक्ष्मीबाई माहिती मराठी – राणी लक्ष्मीबाई, झाशीची योद्धा राणी, धैर्य, लवचिकता आणि नेतृत्व यांचे चिरंतन प्रतीक आहे. 1857 च्या भारतीय बंडाच्या वेळी तिचे लोकांप्रती असलेले अतूट समर्पण आणि तिच्या अदम्य भावनेने, तिला लाखो भारतीयांच्या हृदयात एक आदरणीय स्थान मिळवून दिले आहे आणि आम्हाला आठवण करून दिली आहे की एखाद्या व्यक्तीचे शौर्य राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यास प्रेरणा देऊ शकते.
आपल्या भारत देशामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले, जे आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी, आयुष्यभर झटत राहिले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन एक लोकशाही देश बनला आहे.
देशाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी, वीर पुरुषांच्यासोबत थोर व बलवान पराक्रमी महिलांनी सुद्धा देश वाचवण्यासाठी लढा दिला. या थोर व पराक्रमी महिलांच्या नावामध्ये राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, सावित्रीबाई फुले, जिजाबाई, यांसारख्या विविध थोर पराक्रमी महिलांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात.
|| स्वराज्यरक्षिनी फिरंगमर्दीनी || राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी ||
|| शस्रधारिनी समर भवानी || गंगाधर भार्या झांशी सम्राज्ञीनी ||
राणी लक्ष्मीबाई माहिती मराठी : Rani Laxmibai Information In marathi
मूळ नाव | लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर |
टोपण नाव | मणीकर्णिका (मनू) |
जन्म तारीख | १९ नोव्हेंबर १८३५ |
जन्मतिथी | : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार रात्री ३.४० |
जन्मस्थळ | काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश. |
वडिल | मोरोपंत तांबे |
आई | भागीरथीबाई तांबे |
पती | गंगाधरराव नेवाळकर |
मुल | दामोदर गंगाधरराव नेवाळकर |
संग्राम | १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध |
धर्म | हिंदू |
मृत्यू | १८ जून १८५८ |
मृत्यू स्थान | ग्वालियर, मध्य प्रदेश |

राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर असे होते. बालपणी त्यांना मणिकर्णिका या नावाने सुद्धा ओळखले जात असे. १८५७ च्या झालेल्या सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य चळवळीची शूर नायिका म्हणून, लक्ष्मीबाई यांनी अगदी छोट्या वयामध्ये ब्रिटिश लोकांशी मोठ्या धाडसाने लढा दिला होता.
त्यांच्या मुखावर झळकणारे मा दुर्गाचे रूप, म्हणजे ब्रिटिशांसाठी एक मोठे आव्हानच होते. लक्ष्मीबाई यांच्या कामगिरीमुळे, त्यांच्या धाडसी प्रवृत्तीमुळे, फक्त इतिहासामध्ये त्यांचे नाव गाजले नाही, तर सर्व स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा लक्ष्मीबाई सारखे लढण्याची ऊर्जा, शौर्यता, निर्माण झाली.
महान क्रांतिकारी लक्ष्मीबाई यांचा जन्म
राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ साली उत्तर प्रदेशामधील वाराणसी नगरातील मैदानी नगर येथे झाला. राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव हे मणिकर्णिका होते. व त्यांना लहानपणी सर्वजण मनु या नावाने ओळखत.
लक्ष्मीबाई यांचे प्रारंभिक जीवन आणि कुटुंब
लक्ष्मीबाईंचे वडील मोरोपंत तांबे होते. मोरोपंत तांबे हे पुण्यात पेशवे यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या घोडेगावचे भट्ट. साताऱ्याच्या ब्रह्मानंद स्वामी यांनी तांबेंना पेशव्यांच्या आश्रयाला पाठवले.
मोरोपंत तांबे हे आधुनिक विचारसरणीचे होते. मोरोपंत यांना मुलींच्या स्वातंत्र्यावर, व शिक्षणावर अतूट विश्वास होता. त्यामुळे त्यांनी लक्ष्मीबाईंना सुद्धा तसेच घडवण्याचा निर्णय घेतला. व याचा प्रभाव लक्ष्मीबाई यांच्यावर होत होता.
- महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी
- संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी
- संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी
मोरोपंत यांनी लक्ष्मीबाई, यांना लहानपणी विविध प्रकारची कौशल्य शिकवली. तलवार चालवणे, घोडा चालवणे, यामध्ये त्यांनी त्यांना तरबेज केले. लक्ष्मीबाई यांच्या आईचे नाव भागीरथीबाई असून, त्या गृहिणी होत्या. परंतु दुर्दैवाने लक्ष्मीबाईंच्या आई लक्ष्मीबाई वयाच्या अवघ्या चार वर्षाच्या असतानाच मृत्यू पावल्या होता. त्यामुळे वडील मोरोपंत यांनी लक्ष्मीबाई यांचे लहानपणापासून संगोपन केले. व त्यांना योग्य संस्कार देऊन स्वातंत्र्यासाठी एक क्रांतिकारी बनवले.
महाराणी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासोबत स्वतःचे संरक्षण कसे करावे? घोडेस्वारी कशी करावी? इत्यादीबद्दल प्रशिक्षण घेतले. व तसेच पुरातत्व शास्त्रात सुद्धा, लक्ष्मीबाई या पारंगत होत्या.

लक्ष्मीबाईंचे बालपण
राणी लक्ष्मीबाई त्यांच्या आई भागीरथीबाई, यांच्या मृत्यूनंतर, वडिलांनी लक्ष्मीबाईंना पुणे जवळ विठूर येथे स्थलांतरित केले. जेथे लक्ष्मीबाईंचे बालपण रमले. त्यांना मणिकर्णिका या नावाने त्या ठिकाणी ओळख मिळाली.
लक्ष्मीबाई आणि नानासाहेबांचे किस्से
लक्ष्मीबाई ह्या लहानपणापासून चतुर, व पराक्रमी होत्या. एकदा काय झाले की, त्या घोड्यावरून सवार होत असताना, नानासाहेब यांनी लक्ष्मीबाईंना आवाहन दिले की, तुम्ही माझ्या घोड्याच्या पुढे जाऊन दाखवा. यावेळी लक्ष्मीबाई यांनी नानासाहेबांचे आवाहन अगदी मनापासून स्वीकारून त्या हसून म्हणाल्या की मला तुमचे आवाहन स्वीकारते. व लक्ष्मीबाई यांनी नानासाहेबांसोबत घोड्यांची शर्यत करायचे ठरवले.
नानासाहेबांचा घोडा इतका वेगाने धावत असताना सुद्धा, लक्ष्मीबाई यांनी आपल्या घोड्याचा वेग वाढवत, नानासाहेबांना मागे टाकले. त्यावेळी नानासाहेबांनी सुद्धा, लक्ष्मीबाईंना हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना सफलता मिळाली नाही. व ते स्वतः घोड्यावरून खाली पडले.
यानंतर लक्ष्मीबाई यांनी, आपला घोडा तसाच मागे वळवून, नानासाहेबांना त्यांच्या घोड्यावर बसवले. व त्या घराकडे रवाना झाल्या, यामुळे नानासाहेब लक्ष्मीबाई वरती खूपच प्रसन्न झाले. व त्यांची मन भरून प्रशंसा केली.
त्यानंतर नानासाहेबांनी व त्यांचे पिता रावसाहेबांनी लक्ष्मीबाई यांची छबी ओळखली, त्यांच्यामधील असणारा क्रांतिकारी व शौर्य व्यक्तिमत्व जाणून घेऊन, त्यांना शस्त्रात्र शिकवले. लक्ष्मीबाई कुस्ती मलखांब मध्ये पारंगत होत्या.
युद्धशास्त्र निपुण, शूर, धोरणी, कर्तुत्ववान, नेतृत्ववान अशा लक्ष्मीबाईचा जन्म जरी राजघराण्यात झाला नसला, तरीही राज घराण्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांचा वावर होता. पेशव्यांच्या दरबारी असताना बालवयातच लक्ष्मीबाईनी युद्धशास्त्र शिकून घेतले. त्याबरोबरच मल्लखांब, तलवारबाजी यामध्ये त्या पारंगत झाल्या
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे लग्न
नेवाळकर हे रत्नागिरी येथील कोट गावातील मूळ निवासी होते. नेवाळकरांनी पेशव्यांकडून जळगावच्या पारोळा येथील जहागिरी घेतली व कालांतराने त्यांना झाशी संस्थानाची सुभेदारी पेशव्यांकडून मिळाली. त्यानंतर नेवाळकरांनी इंग्रजांशी तह करून झाशी संस्थानात महाराज ही पदवी धारण केली.
लक्ष्मीबाई यांचे लग्न १८४२ मध्ये झाशीचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. लग्नानंतर गंगाधरराव यांनी मणिकर्णिका नाव बदलून लक्ष्मी असे ठेवले. व यानंतर काही काळाने झाशीच्या प्रदेशात राणी लक्ष्मीबाई यांना एक वेगळे स्थान व प्रेम मिळू लागले.
दरबाराच्या कामकाजात राणीने लक्ष घालणे, गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे रिकामी वेळेत लक्ष्मीबाई या आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेबाजी, तलवारबाजी आणि मल्लखांब चालू ठेवत. श्री गंगाधरराव आणि राणी यांना प्रथमतः एक मुलगा झाला. पण तीन महिन्याच्या अंतराने त्याचा मृत्यू ओढवला. त्यानंतर त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नामकरण केले.
परंतु २१ नोव्हेंबर १८५३ मध्ये गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच लक्ष्मीबाईंच्या पतीचे निधन झाले.
लक्ष्मीबाई यांनी झाशीचा राज्यकारभार सांभाळला
अचानक एकेकाळी, महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे, दिनांक २१ नोव्हेंबर १८५३ रोजी, अकस्मात त्यांचे निधन झाले. त्यावेळी राणी या फक्त अठरा वर्षाच्या होत्या.
मुलाच्या मृत्यूनंतर, पतीच्या मृत्यूच्या बातमीमुळे, लक्ष्मीबाई यांना खूप पीडा झाल्या. परंतु या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःवरचा ताबा गमावला नाही. आपल्या प्रजेला व आपला राज्यकारभार सांभाळण्यासाठी, राणी सज्ज झाल्या.
यानंतर राणीनी स्वतः झाशीचा राज्यकारभार चालवण्याचा मोठा निर्णय घेतला.

झाशी संस्थान खालसा
ईस्ट इंडिया कंपनीचे आणि झाशी संस्थानाचे चांगले संबंध होते. त्यामुळे राजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही, असे लक्ष्मीबाईंचे मत होते. यासाठी स्वतः जातीने लक्ष घालून लक्ष्मीबाई ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या.
गव्हर्नर जनरल डलहौसीने संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ मार्च १८५४ साली असा जाहीरनामा सुद्धा करण्यात आला. त्याचप्रमाणे दत्तक विधान नामंजूर करून पुढील वारसाला राजगादी मिळणार नाही, असे बजावण्यात आले. इतर राजे आणि इतर संस्थाने इंग्रजांची मांडीलकी पत्करत असताना, शूरपणे मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तीदायक उद्गार काढणाऱ्या लक्ष्मीबाई या पहिल्या होत्या.
झाशी खालसा झाल्यामुळे लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. हा अपमान सहन करूनही राणी काही काळ शांत राहिल्या.
ब्रिटिश सरकारने राणीचा उत्तराधिकार होण्यास विरोध दर्शविला
राणी लक्ष्मीबाई या पराक्रमी, बलवान, व अतिशय सुंदर व्यक्तिमत्व होते. म्हणून राणी लक्ष्मीबाईंनी अवघ्या अठरा वर्षांमध्ये, झाशीचे अधिपत्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. महाराणी लक्ष्मीबाई यांच्या काळामध्ये असा नियम होता की, राजाला असलेला मुलगा हा राजाच्या मृत्यू नंतर उत्तराधिकारी होईल, व राजाला जर मुलगाच नसेल, तर राजाचे सर्व राज्य हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सामावून घेतले जाईल.
या भयानक नियमामुळे, राणी लक्ष्मीबाई यांना स्वतः झाशी राज्याचे उत्तराधिकारी होण्यासाठी खूप खडतर असे संघर्ष व प्रयत्न करावे लागले. ब्रिटिश सरकारला झाशीचे राज्य त्यांच्या ईस्ट इंडिया या ब्रिटिशन कंपनीमध्ये विलीन करून घ्यायचे होते, यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत होते.
ब्रिटिश सरकारने, महाराणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक पुत्र दामोदर राव यांच्या विरोधात सुद्धा कट रचला. गंगाधर नेवाळकर यांनी घेतलेला कर्जांच्या सोबत ब्रिटिश सरकारने, लक्ष्मीबाईंची झाशीची तिजोरी जप्त केली. व त्यांना मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून ब्रिटिश पैसे वजा करून घेतील असा निर्णय घेतला गेला.
त्यामुळे लक्ष्मीबाईंना झाशीचा किल्ला सोडून, त्यांच्या राणीमहलात परतावे लागले. परंतु तरीही राणी लक्ष्मीबाई डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. आपले झाशी राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात देणार नाही या निर्णयावर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ठाम होत्या. त्यांनी झाशी वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, यासाठी त्यांनी सैन्याच्या संघटनेची स्थापना सुद्धा केली.
राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरुद्ध कायम बंड पुकारत होत्या. “मै अपनी झांसी नही दूंगी” या प्रेरणादायी उद्गाराने त्यांनी संघर्षाची सुरुवात केली. दिनांक ०७ मार्च १८५४ रोजी ब्रिटिश सरकारने झाशीवर ताबा मिळवण्यासाठी, सरकारी राजपत्र सुद्धा घोषित केले. ज्यामध्ये त्यांनी झाशीच्या राणीला झाशीला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करण्याचे आदेश दिले होते. परंतु राणी लक्ष्मीबाई यांनी सरकारी राजपत्राचा निषेध करत त्यांच्या आदेशाचा भंग केला. व त्या म्हणाल्या “मै अपनी झांसी नही दूंगी”.
झाशीला वाचवण्यासाठी, महाराणी लक्ष्मीबाई यांनी आजूबाजूच्या राज्यांच्या मदतीने सैन्याची संस्था स्थापन केली. सैन्य संस्थेमध्ये मोठ्या संख्येने लोक हे सहभागी झाले होते. नवल तर हे आहे की, या सैन्यांमध्ये महिलांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात शस्त्रे, दोस्त खान, खुदाबक्ष, गुलाम खान, सुंदर मुंदर, काशीबाई, मोतीबाई, दिवान रघुनाथ सिंग, लाला भाऊ बक्षी, दिवाण जवाहर सिंग, यांसारखे पराक्रमी ११४ सैनिक सामील होते.
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई यांची भूमिका
दिनांक १० मे १८५७ साली राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांविरोधात, लढा करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये बंदुकीच्या गोळ्यांवरती डुकराचे आणि गौमांस लावण्यात आले होते. यामुळे हिंदूंच्या अध्यात्मिक धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या.
ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारामुळे, संपूर्ण भारत देशात संताप निर्माण झाला. परंतु १८५७ मध्ये शेजारील राज्यांच्या राजाने झाशीवर हल्ला केला, परंतु महाराणी लक्ष्मीबाई यांनी तिच्या शौर्य, पराक्रमाने, झाशी त्या दोन राज्यांना मिळवून दिले नाही. व झाशीवरती स्वतःचा विजय प्राप्त केला.
१८५८ मध्ये इंग्रजांनी पुन्हा झाशीवर हल्ला केला
सन १८५८ मार्च मध्ये इंग्रज अधिकारी “सर ह्यू रोज” याच्या नेतृत्वाखाली, झाशीवर अधिपथ्य मिळवण्यासाठी झाशीवर पुन्हा एकदा हल्ला केला. परंतु झाशीला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी तात्या टोपे यांच्या नेतृत्वात सुमारे वीस हजार सैनिकांनी लढा देण्यास सुरुवात केली.
हा संघर्ष सुमारे दोन आठवडे असाच चालत होता. या झालेल्या घनघोर युद्धामध्ये, ब्रिटिश सरकारने झाशीच्या किल्ल्यांच्या भिंती तोडून उध्वस्त करून, तो ताब्यात घेतला. या खडतर काळात सुद्धा राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांचे धैर्य सोडले नाही, व स्वतःचा मुलगा दामोदर यांना या संघर्षामधून त्यांनी कसेबसे वाचवले.
राणी लक्ष्मीबाई यांचे युद्ध कौशल्य
१८ जून १८५८ रोजी पहाटे ब्रिटिश अधिकारी स्मित सैन्यासोबत ग्वाल्हेरच्या अगदी समीप येऊन ठापले. व त्याने लगेच झाशी वरती हल्ला केला. या हल्ल्यामुळे, राणी लक्ष्मीबाई या रणांगणामध्ये अगदी धावत आल्या, लक्ष्मीबाईंनी त्यांच्या शौर्याचे प्रताप दाखवून तलवारीने अगदी सप सप वार करीत समोर येणाऱ्या प्रत्येक ब्रिटिश सैनिकास कापून टाकले.
रागाने लालेबुंद झालेल्या व विजेसारख्या तळपाळणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या रौद्र रूपाकडे पाहून, इंग्रज सुद्धा रागाने संघर्षाने लढत होते. राणींच्या या घनघोर युद्धाचा सामना बघून, इंग्रज अधिकारी स्मित सैन्य हे मागे परतणारच होते, त्याच क्षणी नव्या दमाची सैन्ये बाजूच्या टेकडीवरून धावत आली.
दोन्ही बाजूने आलेल्या सैन्यासमोर, राणी लक्ष्मीबाई एकट्या लढू शकल्या नाहीत. यामुळे राणी लक्ष्मीबाई बाहेर पडल्या. थोडे पुढे जाऊन, राणी लक्ष्मीबाई एका ओढ्यापाशी पोहोचल्या, ओढा पार करण्यासाठी घोडा ओढा ओलांडू शकत नव्हता. तितक्यातच त्यांच्यासमोर इंग्रज येऊन थांबले.
परंतु, राणी लक्ष्मीबाई यांनी पुरुषी पेहराव केल्यामुळे इंग्रज त्यांना ओळखू शकले नाही. लक्ष्मीबाई अत्यंत घायाळ अवस्थेत रक्तबंबाळ झाल्या होत्या. त्यातच त्यांच्या एका निष्ठावान सेवक याने लक्ष्मीबाईंना एका मठात आणले. राणी लक्ष्मीबाई यांची शेवटची इच्छा होती की, त्यांचा देह इंग्रजांच्या हाती लागू नये, म्हणून त्या सेवकाने राणी लक्ष्मीबाईंना मुखाग्नी दिला. व राणी त्यांच्या वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी वीरगतीस प्राप्त झाल्या.
राणी लक्ष्मीबाई यांना वीरगती
इ.स. १७ जून १८५८ (शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी) रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या.
१८ जूनला इंग्रज सरकारने लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले. आणि म्हणून आज पर्यंत १८ जूनला त्यांची पुण्यतिथी साजरी होते.
१९ जून १८५८ रोजी वर्तमान पत्राद्वारे भारत व जगभरात लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूची बातमी पसरली. युद्धकाळातील सर्व इंग्रज अधिकाऱ्यांचे महाराणी व्हिक्टोरिया द्वारे सन्मानित करण्यात आले. तसेच झांशी सह ग्वाल्हेरचे अधिकार पुन्हा जियाजीराव शिंदे उर्फ सिंधिया यांस देण्यात आले.
राणी लक्ष्मीबाई यांची मृत्यूतिथी
श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १९१५ श्रीनृप शालिवाहन शक १७८० मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १८४ जेष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी वार गुरुवार दिनांक १७ जून १८५८ कोटा की सराय, फुलबाग, ग्वाल्हेर,मध्य प्रदेश.
राणी लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था
- महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)
- रानी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)
- रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)
- लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)
- रानी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)
- सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाने “राणी झाँसी”रेजिमेन्ट
- रानी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ (महाराष्ट्र)महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची रानी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)
- रानी लक्ष्मीबाई सेना गुजरात नावाने महिला सशक्तीकरण करणारी संघटना.
- अखिल विश्व केसरिया परिषद राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमंत रानी नमामि पंड्या द्वारे संचालित.
- इ.स. १९५७ साली भारत सरकारने छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.
राणी लक्ष्मीबाईंचे स्थानक, पुतळे, चौक
- ग्वाल्हेर येथील पवित्र समाधी स्थळ व अश्वारूढ पुतळा.
- नागपूर येथे बर्डी मार्ग येथे ‘झांशी राणी चौक’ व ‘पुतळा’
- नवी दिल्ली येथे ‘रानी झांसी मार्ग’
- मुंबई येथील शीव/सायन स्थानका जवळ बेस्ट बसचे “रानी लक्ष्मीबाई चौक”
- झांसी येथील ‘वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी जंक्शन’ नावाचे भारतीय रेल्वे स्टेशन
- बोरीवली येथे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्यान’
- मालाड येथे ‘रानी लक्ष्मीबाई मैदान व भाजी मंडई’
- राहुरी येथे ‘राणी झांशी कंपाऊंड’, ओसीपीएम स्कूल
- कोल्हापूर येथील कावळा नाका येथे भव्य ‘झांशी रानी लक्ष्मीबाई पुतळा’
- नागपूर येथे “राणी झांशी” नावाचे मेट्रो स्थानक
- पुणे येथे छत्रपती संभाजीराजे उद्यानाजवळ ‘राणी झांशी चौक’ व ‘अश्वारूढ पुतळा’
राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार
- भारत सरकारचा रानी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार
- उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार
- मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते.
प्रश्नोत्तरे
झाशीची राणी लक्ष्मीबाई कोण होती?
लक्ष्मीबाई, झाशीची योद्धा राणी, धैर्य, लवचिकता आणि नेतृत्व यांचे चिरंतन प्रतीक आहे. 1857 च्या भारतीय बंडाच्या वेळी त्यांनी ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तिचे लोकांप्रती असलेले अतूट समर्पण आणि तिच्या अदम्य भावनेने, तिला लाखो भारतीयांच्या हृदयात एक आदरणीय स्थान मिळवून दिले आहे
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला?
लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार रात्री ३.४० वाजता भारतातील वाराणसी येथे झाला.
1857 च्या भारतीय बंडात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका काय होती?
1857 च्या भारतीय बंडात लक्ष्मीबाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिने आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आपल्या पतीच्या मृत्यूनंतर झाशीवर ताबा मिळवण्याच्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रयत्नांविरुद्ध निर्भयपणे आपल्या सैन्याचे नेतृत्व केले आणि मृत्यू पत्करला
राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कसा झाला?
ग्वाल्हेरच्या लढाईत 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. रणांगणावर शौर्याने लढताना ती गंभीर जखमी झाली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला.
राणी लक्ष्मीबाई यांना मुले होती का?
होय, राणी यांना प्रथमतः एक मुलगा झाला. पण तीन महिन्याच्या अंतराने त्याचा मृत्यू ओढवला. राणी लक्ष्मीबाईंना दामोदर राव नावाचा एक दत्तक मुलगा होता, ज्याला तिने पतीच्या मृत्यूनंतर तिचा वारस म्हणून दत्तक घेतले होते.
राणी लक्ष्मीबाईच्या काही उल्लेखनीय कामगिरी काय होत्या?
राणी लक्ष्मीबाईंची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 1857 च्या भारतीय बंडखोरीदरम्यान ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेला शूर प्रतिकार. युद्धादरम्यान त्यांच्या शौर्य, धैर्य आणि नेतृत्वासाठी त्या लक्षात ठेवल्या जातात.
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ कविता कोणची आहे ?
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ ही कविता सुभद्रा कुमारी चौहान यांची आहे
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास झाशी च्या राणी बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला ? कमेंट करून आम्हाला कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारंसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.