सर्वपित्री अमावस्या संपूर्ण माहिती मराठी | Sarvpitri Amavasya Information In Marathi

सर्वपित्री अमावस्या संपूर्ण माहिती मराठी | Sarvpitri Amavasya Information In Marathi – हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो १५ दिवस चालतो. असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धी देतात.

पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरला सुरू होऊन १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. याबाबत ची सगळी माहीती आज आम्ही आमच्या या लेखातून घेऊन आलो आहोत. चल तर मग, पाहुयात सर्वपित्री अमावस्या.

Table of Contents

सर्वपित्री अमावस्या संपूर्ण माहिती मराठी | Sarvpitri Amavasya Information In Marathi

या पितृ पक्षातील अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या या वर्षी १४ ऑक्टोबरला आहे. याला महालय किंवा सर्वपित्री दर्श अमावस्या असेही म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम आहे, जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो.

असे मानले जाते की, सर्वपित्री अमावस्या या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. अशी समजूत आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म करू शकतो.

इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. तसेच काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाहीत तर या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे, इच्छेनुसार दान केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान,शांती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

पितृपक्षातील सर्वांत महत्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सर्वपितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित एक धार्मिक कृती आहे. या दिवशी ब्राम्हणांना भोजन घालण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी देखील मान्यता आहे. यादिवशी आंघोळ करून शुद्ध आचरणाने अन्न तयार करावे.

अन्न सात्विक असावे आणि त्यात खीर आणि वडे असावे. पितरांच्या फोटोला हार घालावा. त्यांची पूजा करावी व घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा. त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी.

सर्व पितृ म्हणजे सर्व पितरं म्हणचेच आपले पूर्वज. आणि अमावस्या ज्याला आपण अवस देखील म्हणतो. त्याचा अर्थ आहे, ‘नवा चन्द्र दिवस’. काही भागात हा दिवस ‘महालय’ किंवा म्हाळ म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे या महत्वाचा दिवसाला महालय अमावस्या किंवा सर्वपितृ मोक्ष अमावस्या देखील म्हटले जाते.

हिंदू दिनदर्शिकेनुसार भारतात भाद्रपदाच्या महिन्यात सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाते. हिंदू धर्मात या विधीला खूप महत्व आहे. सर्वपितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध पक्षाची शेवटची तिथी असते. भाविक विविध श्राद्धाचे पालन करतात. भाद्रपद महिन्यात, हा काळ पंधरा दिवसाचा असतो, जो पौर्णिमेला सुरु होऊन अमावस्येला संपतो.

Sarvpitri Amavasya Information In Marathi

सर्वपित्री अमावस्या 2023 कधी आहे?

29 सप्टेंबरला आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून पितृ पक्ष सुरू होईल, 14 ऑक्टोबरला अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला समाप्त होईल. भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून अश्विन कृष्णाच्या अमावास्येपर्यंत एकूण 16 दिवस श्राद्ध चालते. 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे

14 ऑक्टोबर 2023सर्व पित्री अमावस्याअमावस्या तिथीची सुरुवात – 13 ऑक्टोबर 2023 – 09:50 PM
अमावस्या तिथीची समाप्ती – 14 ऑक्टोबर 2023 – रात्री 11:24 PM

पितृ पक्ष संपूर्ण माहिती मराठी

सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय? (सर्व पितृ अमावस्या)

अमा’ म्हणजे सह, ‘वस्’ म्हणजे राहणे. ‘सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या’ म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या म्हणावं असे सांगितले गेले आहे. सर्व पितृ म्हणजे सर्व पितरं म्हणचेच आपले पूर्वज. म्हणून या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. सध्या काही लोक ही अमावास्या अशुभ असते असे मानतात.

अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी

परंतु प्राचीनकाळी सर्वपित्री अमावस्या ही शुभ मानली जात असे. अथर्ववेदातील सूक्तामध्ये अमावास्या असे म्हणते की, “समस्त देव माझ्याप्रत येऊन माझ्या ठायी निवास करतात. साध्यादी देव, तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्यासह राहत असल्यानेच मला अमावास्या हे नाव मिळाले.”

सर्वपित्री अमावस्या बद्दल माहिती (Sarv Pitru Amavasya)

सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी मरण पावलेल्या त्या सर्व पितरांना तर्पण केले जाते ज्यांचा ‘पौर्णिमेला’, अवसेला, किंवा चतुर्दशी तिथीला मृत्यू झाला असेल. या दिवशी, सकाळी लवकर उठुन संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ स्नान करून सकाळचे सर्व नित्यकर्म आटपून पांढरे धोतर घालतात. अन्नदान आणि देणगी देण्यासाठी ब्राम्हण यांना आमंत्रित करतात.

सामान्यतः: श्राद्ध समारंभ कुटुंबियातील ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुरुषानेच करावयाचा असतो. आमंत्रित व्यक्तीचे हात-पाय धुवून त्यांना आदराने बसवले जाते. सर्व पितृ अवसेला लोकं पूजा करतात आणि फुलं, दिवा आणि धूपबत्ती लावून आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करतात.

सर्वपित्री अमावस्या बद्दल माहिती

पूजेची विधी पूर्ण झाल्यावर निमंत्रितांना जेवण देतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सतत मंत्रोच्चार केले जातात. कुटुंबीय आपल्या पितरांची माफी मागतात आणि त्यांनी आयुष्यात दिलेल्या त्यांचा योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त करतात. त्याचबरोबर ते त्यांना सद्गती आणि शांती मिळविण्यासाठी देखील प्रार्थना करतात.

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

तर्पण करून सर्व पितरांना तृप्त केले जाते

ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर अशांचे श्राद्ध पितृपक्षात येणार्‍या सर्वपित्री अमावस्या यादिवशी केले जाते. पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी सकाळी तयार केल्या जाणार्‍या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून करतो. विधीवत पूजा करून गाय, कुत्रा व कावळा यांचा नैवेद्य केळीच्या पानावर दिला जातो.

सर्वपित्री अमावस्या या दिवशी पितरांसाठीच्या पंचपक्वान्नांनी सजवलेल्या ताटाचा सुंगध घेऊन गायीला नैवेद्य दिला जातो. अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आपापल्या वाटेला निघून जातात. त्याप्रमाणे पितर म्हणून आलेल्या व्यक्तीला पोटभर जेवण झाल्यावर, त्यांना कपडे, रूमाल-टोपी व चपला देऊन अमावस्येच्या सायंकाळीच निरोप दिला जातो.

सर्वपित्री अमावस्या चे महत्व

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे.

पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे देखील सांगितले आहे.

सर्व पितृ अमावस्येची तिथी आणि विधी खूप महत्वाचा मानला जातो. कारण ते त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आणि आपल्याला समृद्धी, सौख्य कल्याण आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी साजरे करतात. श्राद्ध कर्म करणारे कुटुंब यमाचे आशीर्वाद मिळवतात आणि कुटुंबियातील मंडळीना कोणत्याही प्रकारच्या वाईट होणं किंवा अडथळ्यांपासून वाचविण्याची विनवणी करतात. असे देखील म्हटले जाते. या दिवशी, पितरं भेट देतात आणि जर आपण त्यांचे कार्य श्रद्धेने न केल्यास ते रागवून परत जातात.

गौरी आवाहन पूजा माहिती मराठी

ज्योतिष शास्त्रानुसार, असे मानले जाते की पितरांनी जिवंतपणी केलेल्या काही चुका किंवा केलेले पाप पितृदोष म्हणून त्यांच्या संततीच्या कुंडलीत आढळतो. या गोष्टींचा त्यांच्या मुला -बाळांच्या आयुष्यात फार वाईटपरिणामांना सामोरे जावे लागते. म्हणूनच सर्वपित्री अमावस्या या दिवशी विधींचे पालन करून या पितृदोषांना दूर करून आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवू शकतो.

सर्वपित्री अमावस्या चे महत्व

सर्वपित्री अमावस्येला केलेल्या श्राद्ध विधीमुळे भगवान यमाचे देखील आशीर्वाद मिळतात, असे सांगितले जाते. तसेच पूर्वजांचे कुटुंब आपल्या जीवनातील सर्व प्रकारांचे पाप आणि अडथळ्यांपासून मुक्त होतात. हे श्राद्ध पितरांच्या आत्म्याला सद्गती आणि मुक्ती देण्यास मदत करतात. हे श्राद्ध विधी केल्याने संततीला समृद्ध आणि दीर्घायुष्य असण्याचा आशीर्वाद मिळतो.

पवित्र दर्भाचे महत्त्व

महाभारतातील एका कथेनुसार गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन येत असताना काही वेळासाठी तो कलश त्यांनी दर्भावर ठेवला होता. अमृत कलश दर्भावर ठेवल्याने त्यावेळेपासून दर्भाला पवित्र समजले जाते. श्राद्ध विधीच्या वेळी दर्भापासून बनवलेली अंगठी अनामिकेत धारण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे.

असे समजले जाते की, दर्भाच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णु आणि मूळभागी भगवान शिव निवास करतात. म्हणूनच श्राद्धकर्मात दर्भाची अंगठी धारण केल्याने ‘आम्ही पवित्र होऊन आमच्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म आणि पिंडदान केले’, असे समजले जाते.

श्राद्धकर्म कोणाकडून करवून घ्यावे?

श्राद्धकर्म करणार्‍या व्यक्तींसंदर्भात हिंदू धर्म ग्रंथात आणि शास्त्रग्रंथात काही नियम सांगितले आहेत. श्राद्धकर्म करणारी ही व्यक्ती वेदज्ञानी, पतितपावन, धर्मशास्त्रावर श्रद्धा असणारी असायला हवी. तसेच ते शांतचित्त, नियमाने, धर्माने वागणारी, तप करणारी, पित्याचा आदर करणारी, आचारवान आणि अग्निहोत्री असावी. जर अशा योग्यतेची व्यक्ती आपल्याला मिळाली नाही, तर तत्त्वज्ञानी योग्याला बोलवून हे श्राद्ध कर्म करून घ्यावे.

आणि हे असे योगीही मिळाले नाहीत, तर एखाद्या वानप्रस्थीला अन्नदान करून श्राद्ध कर्म करावे. तसेच वानप्रस्थी देखील मिळाले नाहीत, तर मोक्षाची इच्छा ठेवणार्‍या, अर्थात् साधकवृत्ती असणार्‍या गृहस्थाला अन्नदान करावे.

ज्या व्यक्ती ध्यान-पूजा, यज्ञ आदी नियमित कर्म करत नाहीत, अक्षय व्यक्तींना बोलावून श्राद्धकर्म केल्याने पितरांना आसुरी योनी प्राप्त होते. एवढेच नाही, तर माता-पिता, गुरु यांचा आदर न करणारा, असत्य बोलणारा, मद्यपी, वेश्यागमन करणारा, ईश्‍वरावर विश्‍वास न ठेवणारा, चरित्रहीन, वेदांची निंदा करणारा, तसेच उपकार न मानणारा अशा व्यक्तीस श्राद्धकर्म करण्यास बोलावू नयेच,

आणि त्यांना दक्षिणाही देऊ नये. जे दान सदाचारी व्यक्तीला दिले जाते, त्यालाच ‘दान’ म्हटले जाते.आपल्या इच्छे नुसार आणि ऐपतीप्रमाणे दान करावे दान देतांना कुटुंबाची उपेक्षा करून दान देऊ नये.

पितृपक्षात पितरांना श्रद्धा पूर्वक तर्पण किंवा अन्न अर्पण केल्यास पितरे संतुष्ट होतात असे समजले जाते. हिंदु असो वा अन्य कोणत्याही पंथाची व्यक्ती असो, जी धर्मशास्त्रांचे पालन करील, तिला त्याचा निश्‍चित लाभ होईल. ज्याप्रमाणे एखादे औषध घेणार्‍या व्यक्तीला, मग ती कोणताही पंथ, जात, धर्म यांची असो, तिला या गोष्टींचा नक्की लाभ होतो. तसेच हिंदु धर्मशास्त्रानुसार कृती केल्याने सर्वांनाच त्याचा लाभ होतो.

सर्वपित्री अमावस्येचे विधी

पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो.

त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावस्येला काय दान करावे ?

पितृ पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच भोजन दिले पाहिजे. पितृ पक्षात पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी दिल्याने विशेष लाभ होतो. त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात. पितरांना सर्वपित्री अमावस्याची देवता मानले जाते आणि या दिवशी पूर्वज आपल्या कुटुंबाकडे येतात आणि त्यांच्यासाठी दान करण्याची आशा करतात.

पितृ पक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे.सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करावे. आणि गरजूंना दान करावे. तुमची सत्कर्म करण्याची दानत पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आशीर्वाद देतात.

सर्वपित्री अमावस्येला अन्नदान का करावे ?

महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी मृत्यू झाला, त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गात गेला. त्याठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती म्हणून त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले, त्यावेळी इंद्राने कर्णाला सांगितले की, त्याने आयुष्यभर सोने दान केले,परंतु आपल्या पूर्वजांना श्राद्धात कधीही अन्न दिले नाही.

त्यावेळी कर्ण म्हणाला की, तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी, कर्णाला १५ दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली जेणेकरून तो हे श्राद्ध करू शकेल आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल.

त्यावेळपासून हा काळ पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो. पृथ्वीवर परत येऊन तेथे त्याने त्याच्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध केले आणि अन्नदान केले. तसेच त्यांच्यासाठी तर्पण केले. या कथेतून आपण समजू शकतो की, सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान, अन्नदान आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिक आहे!

महाभारतात सर्वपित्री अमावास्येचा उल्लेख

महाभारतात एके ठिकाणी अमावास्येचा ‘एक भयंकर मुहूर्त‘ असा उल्लेख केलेला दिसून येतो. महाभारतात काही ठिकाणी अमावास्या ही शुभ मानलेली दिसून येते. तर काही ठिकाणी अशुभ मानलेली आहे. कृष्णाने कर्णाजवळ युद्धघोषणा करतांना म्हटले आहे, “आजपासून सातव्या दिवशी अमावास्या आहे. इंद्र ही तिची देवता आहे. त्या दिवशी युद्धाला प्रारंभ होईल.” श्रीकृष्णाला यादवांच्या विनाशाची जी लक्षणे दिसत होती, त्यातच त्यांनी ‘त्रयोदशीयुक्त अमावास्या ‘ हा एक योग देखील सांगितला आहे. भारतीय युद्धाच्यावेळी असाच योग होता, हेही त्याने याच वेळी सांगितले आहे.

पितृ अमावस्येला काय करावे

  • पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृ तर्पण करावे. ब्राह्मण भोजन घालावे तसेच दान करावे. आणि गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावे. गाईला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळते. असे म्हटले जाते.
  • जर आपण पितृ पक्षात तसेच सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांना पिंडदान केले तर या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते.
  • पितृ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे धोतर परिधान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आगारी म्हणजेच जेवणाचे पान अग्नीत टाकून पिंपळाच्या झाडाखाली पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
  • पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. दर्भ वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात असे म्हटले जाते.
  • पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो, अशी श्रद्धा आहे.

पितृ अमावस्या काय करू नये

  • कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृ पक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते.
  • पितृ अमावस्येच्या दिवशी दारात रिकाम्या हाताने येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका, त्यांना काहितरी दान करा.
  • पितृ अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये. दारूचे सेवन करू नये.
  • संपूर्ण पितृ पक्षात लोक मांसाहार खात नाहीत आणि पितृ अमावस्या सुरू होताच मांसाहार करायला सुरुवात करतात, असं अनेकदा पाहायला मिळतं. असे केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत.
  • पितृ अमावस्येला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेही करू नका. या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये.
  • नियमानुसार लोखंडी आसनावर बसून श्राद्ध करू नये. रेशीम, घोंगडी, लाकूड, कुशा इत्यादींनी केलेली आसने उत्तम आहेत.
  • श्राद्ध पक्षातील अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल मालिश करू नये. यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • पूर्वजांचे श्राद्ध दुपारनंतर करू नये.
  • या दिवशी कोणत्याही वृद्ध, महिला आणि लहान मुलांना म्हणजे कोणालाच अपशब्द बोलू नका.
  • श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्‍यांच्या घरी श्राद्ध करू नये.

अमावस्येचे आहेत दोन प्रकार

अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक ‘’सिनीवाली’ आणि दुसरी ‘कुहू’. “या पूर्वा अमावास्या सा सिनीवाली । या उत्तरा सा कुहू:” असे वचन आहे. म्हणजेच अमावस्येला जन्म आणि चंद्राची काही अवस्था बाकी असताना कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला त्याला सिनिवली जन्म म्हणतात. आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला जेव्हा अमावस्या पूर्ण होणार आहे, तेव्हा चंद्राचा टप्पा नष्ट होतो ‘कुहू‘ म्हणतात. असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे.

दिनमानाचे पाच भाग करावे. पहिला भाग प्रात:काळ, दुसरा भाग संगवकाळ, तिसरा भाग मध्यान्हकाळ, चौथा भाग अपराण्हकाळ आणि पाचवा भाग सायंकाळ मानावा असे सांगण्यात आले आहे. अपराण्हकाळी अमावास्या असेल त्या दर्श अमावास्येस अमावास्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे. अमावास्येला नदीस्नान करण्याची प्रथाही प्राचीनकाळी होती.

वेगवेगळ्या अमावास्यांची नावे

  • अमावास्या सोमवारी आल्यास तिला ‘सोमवती अमावास्या‘ म्हणतात.
  • आषाढातील अमावास्या ‘दिव्याची अमावास्या‘ असते. या दिवशी दीपपूजन केले जाते.
  • वैशाख अमावास्येला ‘भावुका अमावास्या‘ म्हणतात.
  • श्रावणातील अमावास्येस ‘पिठोरी अमावास्या‘ म्हणतात.
  • आश्विनातील अमावास्या ‘लक्ष्मीपूजनाची अमावास्या’ ही मंगलदायक मानली जाते.
  • भाद्रपद अमावास्या ही ‘सर्वपित्री अमावास्या‘ म्हणून मानली जाते.

सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व जाणून घ्या

महालय अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्येला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना त्यांच्या आवडीचे विविध प्रकारचे पदार्थ तयार करून अर्पण करायची पद्धत आहे. अशी मान्यता आहे की त्याच वेळी, पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबांना आशीर्वाद देतात.

या दिवशी अनेक प्रकारचे अन्न तयार करून कावळे, गाय आणि कुत्र्यांना खाऊ घालावे. याशिवाय या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. असे केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी व्यवसायात येणाऱ्या संकटांपासूनही मुक्ती मिळते.

सर्वपित्री अमावस्या उपाय

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत सुक्या खोबऱ्यात छिद्र करून त्यात साखर, तांदूळ, मैदा यांचे मिश्रण भरावे. नंतर पिंपळाच्या झाडाजवळील खड्ड्यात नेऊन गाडावे. नारळाचे फक्त छिद्र दिसत असल्याची खात्री करा. असे केल्याने सर्व कीटक ते खातात.

असे मानले जाते की, हा उपाय केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांवर प्रसन्न होऊन त्यांना सुख-समृद्धीचा आशिर्वाद देतात. पितृ पक्षामध्ये विविध प्राण्यांना अन्न दिल्याने अनेक फायदे होतात असेही सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू पीपळाच्या झाडात वास करतात. त्यामुळे हा उपाय अधिक फलदायी ठरतो.

तर्पण करणे

जर तुम्ही पितृ पक्षात पितरांना तर्पण करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करू शकता. तर्पण केल्यास पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते.

दान करणे

सर्वपित्री अमावस्येला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे दान सर्वोत्तम मानले जाते.

ब्राह्मणाला भोजन देणे

सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नावाने अन्न बाहेर काढून मोकळ्या जागेवर किंवा घराच्या छतावर ठेवून कावळ्यास खावू घालणे शुभ समजले जाते. याशिवाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला घरी बोलावून पोटभर जेवण तसेच वस्त्र आणि आपल्या ऐपतीनुसार,इच्छेनुसार दक्षिणा देऊन आदरपूर्वक सेवा केल्यास पूर्वजांचे विशेष आशिर्वाद मिळतात. 

सर्वपित्री अमावस्येदिवशी कोणाचे श्राद्ध करता येते ?

ज्या व्यक्ती पौर्णिमा अथवा अमावस्येला मरण पावले असतील अश्या व्यक्तींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास शक्य झाले नसेल तेंव्हा अशा सगळ्या पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात. इतर कोणत्याही कारणाने तसेच जर आपल्याला आपल्या पुर्वजांच्या मृत्युची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध या अमावस्येला करू शकतो. यामुळेच या अमावस्येला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात.

सर्वपित्री अमावस्ये दिवशी श्राद्ध का करावे ?

श्राद्ध कर्म केले असता पितरउदोष दूर होऊन धन, धान्य, कीर्ती, समृद्धी, आरोग्य, यश, स्वर्ग , पुष्टी, बल प्राप्त होते. ह्या दिवशी आपल्या कुळाच्या वृद्धीसाठी, वंशवृद्धी व्हावी म्हणुन सपिंड श्राद्ध केले जाते. म्हणजेच या दिवशी ब्राम्हण भोजन व पिंड दान करून श्राद्ध केले जाते तसेच पुर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण श्राद्ध केले जाते. ह्यापैकी काही शक्य झाले नाही तर पुर्वजांच्या फोटोस नैवेद्य दाखवून पितृअष्टक म्हणावे.

पितृअष्टक

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।

सर्व पितृ अमावस्या कथा

देवांचे पूर्वज अग्नीश्र्वात्त हे सोमपथ लोकात राहत होते. त्यांची मुलगी मानसी ही अच्छेदा नदीच्या रूपात बसली होती. मत्स्यपुराणांमध्ये अच्छेद सरोवर आणि अच्छादनदी यांचा उल्लेख आढळून येतो. एकदा अच्छेदाने १००० वर्ष तपश्चर्य केली. त्यामुळे अग्निश्वात आणि बरीक्षपद आणि त्यांचे इतर पितृगण पितृ अमावसुंसोबत अच्छेदाला वर देण्यासाठी अश्विन अमावास्येच्या दिवशी प्रकट झाले होते. त्यांनी अच्छेदाला सांगितले की, मुली तुझ्या तपश्चर्याने आम्ही प्रसन्न झालो आहोत.

तुला जे हवे ते माग. परंतु अच्छेदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही. आणि अत्यंत तेजस्वी अशा तेज पितृ अमावसुंकडे पाहत राहिली. पूर्वजांनी वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली की प्रभू मला खरोखरच वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले हे अच्छेदा संकोच न करता वरदान माग. यावर तुझा अधिकार आहे. त्यावर ती म्हणाली की, या क्षणी तुमच्यासोबत आनंद घ्यायचा आहे. अच्छेदाचे हे मागणे ऐकून पितृ संतप्त झाले. आणि त्यांनी अच्छेदला शाप दिला की, ती पितृ लोकातून पृथ्वीवर जाशील. अशा प्रकारे शाप दिल्यावर अच्छेदा पूर्वजांच्या पाया पडून रडू लागली.

पितृ अमावसुंन्ना दया आली. आणि ते म्हणाले की, अच्छेदा शापित झाल्यामुळे मत्स्य कन्या म्हणून जन्म घेशील. पितृने पुढे सांगितले की, भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. आणि भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही तू शाप मुक्त होशील आणि पुन्हा पितृ लोकांकडे परत येशील. त्यावर अच्छेदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक करून वरदान दिले की, ही आमवासाची तारीख अमावसू म्हणून ओळखले जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतील.

तेव्हापासून ही अमावस्या महत्त्वाची समजली जाऊ लागली. आपल्या पापाच्या प्रायशचित्ता साठी अच्छेदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेद व्यासांच्या आई सत्यवती बनल्या. आणि नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्र वीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावानेच कलियुगात अष्टक श्राद्ध मानले जाते.

सर्व पितृ अमावस्या 2023 प्रश्न

सर्वपित्री अमावस्या चे महत्व काय आहे ?

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे.


सर्वपित्री अमावस्या चांगली आहे का?

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, लाहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले, घरदार, जमीन, धन-संपत्ती ठेवली अश्या पूर्वजांचे आत्मे पंधरा दिवसांसाठी आपल्या घरात राहायला येणार असतील, आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणार असेल तर तर ते अशुभ कसे असू शकते? तसेच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार असेल तर सर्वपित्री अमावस्या चांगली आहे.

यावर्षी २०२३ मध्ये सर्वपित्री अमावस्या कधी आहे ?

यावर्षी २०२३ मध्ये सर्वपित्री अमावस्या शनिवार १४ ऑक्टोबरला आहे.

कोणाचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात?

ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर अशांचे श्राद्ध पितृपक्षात येणार्‍या सर्वपित्री अमावस्येला केले जाते.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे सर्वपित्री अमावस्याबद्दल कथा, पिंडदान विधि, आणि माहिती याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment