परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी : PARLI VAIJNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI

PARLI VAIJNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI | परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी – परळी वैजनाथ येथे श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैजनाथ यांचे पवित्र शिवलिंग आहे. त्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढले आहे. कन्याकुमारी ते उज्जैन अशी एक काल्पनिक रेषा ओढली, तर त्या रेषेवर परळी हे गाव आपल्याला दिसून येईल. मेरू पर्वत म्हणजेच नागनारायण पर्वताच्या उतरणीवर हे गाव वसलेले आहे. परळी हे गाव ब्रम्हा, वेणू आणि सरस्वती या तीन नद्यांच्या परिसरात वसलेले असून अतिशय प्राचीन आहे. वैजनाथ मंदिरामुळे याचे महत्त्व अजूनच वाढले आहे.

PARLI VAIJNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI

Table of Contents

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर माहिती : PARLI VAIJNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असून हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी गावात आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात वैद्यनाथ जयंती चा मोठा उत्सव असतो. परळी येथील वैद्यनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांमध्ये जागृत स्थान समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे मानले जाते.

या ज्योतिर्लिंगाचा इतिहास, याची माहिती आम्ही या वेबपेजद्वारे पोचविण्याचा एक प्रयत्न करत आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहुया या मंदिराचा इतिहास आणि त्याची संपूर्ण माहिती.

परळी मंदिर भूगोल

नाव परळी वैजनाथ (PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MANDIR)
स्थान भगवान शंकर
दुसरे नावपरळी वैद्यनाथ
कुठे आहेबीड जिल्हा, परळी
स्थापनादेवगिरीच्या यादवांचा प्रधान, श्री करणाधिप हेमाद्री
जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर
गावपरळी
नदीब्रह्मा, वेणू, सरस्वती
पर्वत मेरू पर्वत
उंची –गावाच्या पृष्ठभागापासून ८० फूट

परळी वैजनाथ मंदिर माहिती मराठी नकाशा

PARLI VAIJNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI

परळी वैजनाथ मंदिर इतिहास (HISTORY OF PARLI VAIJNATH TEMPLE HISTORY)

भारतातील महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पाचवे ज्योतिर्लिंग म्हणजेच परळी वैजनाथ मंदिर होय. येथील स्थान हे जागृत असून ते अतिप्राचीन मानले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री करणाधिप हेमाद्री याने बांधले आहे. असे सांगितले जाते.

पुढे सन १७०६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासंबंधीचे संस्कृत शिलालेख या मंदिरामध्ये आढळून येतात. पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळली. ब्रम्हा,वेणू, सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी पहावयास मिळतो. कांतीपुर, मध्यरेखा, वैजयंती आणि जयंती या नावांनीही हे क्षेत्र ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रावर शंकर व पार्वती दोघे एकत्रच निवास करतात.

विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त परळी या ज्योतिर्लिंगामध्ये शंकर व पार्वती दोघांचाही एकत्र निवास आहे. त्यामुळे या शहराला “अनोखी काशी” असेही म्हटले जाते. त्यामुळे परळीतील लोकांना काशीयात्रा करण्याची गरज नाही.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पासून २६ किलोमीटरच्या अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे लग्न परळीच्या वैजनाथशी ठरले होते. पण वऱ्हाडी मंडळी पोहोचायला उशीर झाला व त्यामुळे विवाह मुहूर्त टळला. यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळी जेथे उतरली होती तेथेच त्यांच्या दगडांच्या मूर्ती बनल्या. तसेच योगेश्वरी परळी पासून दूरच बसून राहिली. अशी लोककथा या भागांमध्ये प्रचलित आहे.

अशी मान्यता आहे की, परळी वैजनाथ मंदिर जवळपास २००० वर्षे जुने आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १८ वर्षे लागली. हे भव्य आणि अतिसुंदर मंदिर मेरू पर्वताच्या उतारावर दगडांनी बनवलेले आहे. आणि गावाच्या पृष्ठभागापासून जवळपास ८० फूट उंचीवर आहे.

परळी ज्योतिर्लिंग गर्भगृह (GARBHGRIHA OF PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MANDIR)

परळी वैजनाथ मंदिरातील गाभारा व सभागृह हे दोन्ही एकाच पातळीवर असल्याने सभा मंडपातूनच भगवान शंकराचे दर्शन होते. अशी रचना बाकीच्या इतर अकरा ज्योतिर्लिंगात कुठेही दिसून येत नाही. बाकीच्या सर्व ठिकाणी मुख्य गाभारा हा थोडा खोलवर बनवलेला आहे. येथील शिवलिंग हे काळ्या शाळीग्राम दगडापासून बनवलेले आहे. गर्भगृहात चारही दिशांना एक अखंड दिवा सतत तेवत असतो.

परळी वैजनाथ मंदिराच्या गर्भगृहाला उत्तर आणि दक्षिण असे दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे “महाद्वार” म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या परिसरात एक मोठा सागवानी लाकडाचा आणि येणाऱ्या भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी मोठा चौक आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ माता-पार्वतीचे मंदिर आहे. गर्भगृहाच्या अगदी समोर वेगवेगळ्या आकाराच्या तीन पितळी नंदी आहेत. तसेच लिंगाच्या वरच्या बाजूला पाच मध्यम आकाराचे चांदीचे गोमुख आहेत, ज्याद्वारे वैजनाथ मंदिरातील लिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरले जाते.

परळी वैजनाथ मंदिराची वैशिष्ट्ये (KEY FEATURES OF PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MANDIR)

भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ मंदिर हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक पौराणिक घटना घडलेल्या आहेत. फार पूर्वी देव दानवांनी समुद्रमंथन केले होते. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली होती. त्यातील धन्वंतरी व अमृत या दोन रत्नांना भगवान शंकराच्या शिवलिंगात लपवून ठेवले होते. असूरांनी जेव्हा या लिंग मूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या. हे पाहून असूर पळून गेले. नंतर जेव्हा शिवभक्तांनी त्या शिवलिंगाला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताच्या धारा वाहू लागल्या. तेव्हापासून आजही या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे.

या मंदिरामध्ये जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद असा कोणताही भेदभाव पाळला जात नाही. कोणीही येथे येऊन सहज दर्शन घेऊ शकतो.

या गावांमध्ये आसपासच्या परिसरात डोंगर भागात नदीकिनारी अनेक उपयुक्त वनौषधी सापडतात. त्यामुळे परळीचे हे ज्योतिर्लिंग “वैद्यनाथ” या नावाने देखील ओळखले जाते.

परळी हे जसे शिव-शक्तीचे एकत्र स्थान आहे तसेच ते हरि-हर मिलना चे ही स्थान आहे. या पवित्र भूमी मध्ये भगवान शंकराच्या बरोबरच भगवान श्रीकृष्णाचा ही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील हरिहर तीर्थाचे पाणी वैद्यनाथांच्या दैनंदिन पूजेसाठी उपयोगात आणले जाते. गुढीपाडवा, विजयादशमी, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीला येथे मोठे उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवांमध्ये तुळस व बेलपत्र यात कसलाही भेदभाव केला जात नाही. महादेवाला तुळशी पत्र व विष्णूला बिल्वपत्र अर्पण करण्याची आगळीवेगळी पद्धत या ठिकाणी चालू आहे.

राणी अहिल्याबाई यांनी वैजनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्रिशलादेवी डोंगरावरून खास दगड आणला होता.

या मंदिराच्या महाद्वारावर एक गवाक्ष आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यातील काही विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे सरळ शिवलिंगावर पडतात.

आमचे हे लेख सुद्धा वाचा. 👇

परळी वैजनाथ मंदिराचा परिसर (SURROUNDING OF PARLI VAIJNATH TEMPLE)

गावामध्ये गावाच्या पृष्ठभागापासून जवळपास ८० फूट उंचीवर मेरू पर्वताच्या उतारावर बांधले गेले आहे. मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडांमध्ये झालेले आहे .अशी आख्यायिका आहे की, अहिल्याबाई होळकर यांना या मंदिराच्या बांधकामासाठी त्यांच्या आवडीचा दगड मिळण्यास खूप त्रास होत होता. शेवटी तिला तो दगड स्वप्नात दिसला. माहिती मिळाली आणि आश्चर्य वाटले की ज्या दगडासाठी ती काळजी करत होती, तो दगड परळी नगर जवळील त्रिशलादेवी डोंगरावर उपलब्ध आहे.

या मंदिराच्या सभोवताली उंच आणि मजबूत अशी भिंत आहे. मंदिरात प्रवेश करताना समोर ओसरी व अंगण आहे. मंदिराच्या बाहेर उंच दीपस्तंभ आहे. त्यावर पवित्र श्लोक लिहिलेला आहे. येथील सभामंडप हा मजबूत लाकडाचा असून तो कोणत्याही आधाराशिवाय उभा केलेला आहे. महाद्वाराजवळ एक गवाक्ष आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यातील काही विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे सरळ शिवलिंगावर पडतात. वैद्यनाथ मंदिर हे उंचावर असल्यामुळे या मंदिरामध्ये जाण्यासाठी मोठ्या आणि मजबूत पायऱ्या तयार केल्या आहेत. त्यांना घाट असे म्हणतात. जुना घाट सण ११०८ मध्ये बांधला आहे.

या मंदिराचा सभामंडप स्वर्गीय रामराव नाना देशपांडे यांनी बांधला. यासाठी त्यांनी स्थानिक कारागीर व नागरिकांची मदत घेतली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वैद्यनाथ मंदिराजवळच एक रामराजेश्वर महादेवाचे मंदिर बनवले आहे. या मंदिराच्या प्रांगणात भगवान शंकराची आणखी अकरा लिंगे आहेत. या लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर असे वाटते की, बारा ज्योतिर्लिंगे एकाच ठिकाणी दिसत आहेत. या मंदिराचा प्रवेशद्वार हा पूर्वेकडे असून बाहेर पडण्याचा मार्ग उत्तरेकडून आहे.

हा विडियो जरूर पहा – परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग

पूजापाठ आणि परळी वैजनाथ दर्शन (POOJA OF PARLI VAIJNATH TEMPLE)

परळी वैजनाथ मंदिर सकाळी ५.०० वाजता उघडते आणि रात्री १०.०० वाजता बंद होते. यावेळी मंदिरात विविध धार्मिक विधी देखील केले जातात.येणारे भाविक येथे होणाऱ्या आरती आणि पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात.

  • दर्शन – सकाळी ५.०० ते रात्री ९.०० पर्यंत
  • अभिषेक – सकाळी ५.०० ते सकाळी ७.००
  • दुपारची पूजा – दुपारी १.०० ते १.३०
  • भस्म पूजा – दुपारी ३.०० ते संध्याकाळी ५.३०
  • सोमवार पूजा – ही प्रत्येक सोमवारीच केली जाते.

मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क

या मंदिरामध्ये जाण्यासाठी साधारणपणे तीस मिनिटांचा कालावधी लागतो. ठराविक सण, उत्सवाच्या दिवशी गर्दी असल्यामुळे त्या दिवशीचा निश्चित कालावधी सांगता येत नाही. या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.

परळी वैजनाथ मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे? (HOW TO REACH PARLI VAIJNATH TEMPLE)

भारतातील महाराष्ट्र राज्यातील, बीड जिल्ह्यामध्ये, परळी या ठिकाणी हे परळी वैजनाथ मंदिर आहे.बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ नाही त्या जिल्ह्याच्या जवळपास असलेली विमानतळ खालील प्रमाणे –

  • लातूर विमानतळ ते बीड १२१ किलोमीटर
  • औरंगाबाद विमानतळ ते बीड १३६ किलोमीटर
  • सोलापूर विमानतळ ते बीड १९० किलोमीटर
  • शिर्डी विमानतळ ते बीड २६२ किलोमीटर

रेल्वे स्टेशन – बीड रेल्वे स्थानकावरून परळी वैजनाथ मंदिराकडे येण्यासाठी ९५ किलोमीटरचे अंतर असून जवळपास २ तास १५ मिनिटांचा वेळ लागतो. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कॅब किंवा बसने येऊ शकता.

बस – परळी वैजनाथ बस स्थानकापासून २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरामध्ये येण्यासाठी ८ मिनिटांचा वेळ लागतो. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही चालत किंवा ऑटोने सुद्धा येऊ शकता.

  • पुणे ते परळी वैजनाथ – १२४ किलोमीटर
  • मुंबई ते परळी वैजनाथ – ५४५ किलोमीटर
  • औरंगाबाद ते परळी वैजनाथ – २१७ किलोमीटर
  • नाशिक ते परळी वैजनाथ – ३९९ किलोमीटर
  • लातूर ते परळी वैजनाथ – ६० किलोमीटर
  • शिर्डी ते परळी वैजनाथ मंदिर – ३२६ किलोमीटर

परळी वैजनाथ मंदिराजवळील पर्यटन स्थळे (PLACES TO VISIT NEAR PARLI VAIJNATH TEMPLE)

परळी वैजनाथ मंदिराला भेट देताना, जवळील तितक्याच सुंदर पर्यटन स्थळांना भेट द्या. यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –

श्री योगेश्वरी माता मंदिर, अंबाजोगाई

श्री योगेश्वरी माता मंदिर, अंबाजोगाई
श्री योगेश्वरी माता मंदिर, अंबाजोगाई

श्री योगेश्वरी अंबाजोगाई नगरीचे एक भूषण आहे. तसे पाहिले तर अंबा नगरीने साहित्य व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीयन मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषणे धारण केली आहे. योगेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले होते व आजही ते कायम आहे.

कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर
कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी शेकडो पर्यटक या मंदिराला भेट देतात हे भगवान शिवाला समर्पित आहे. आणि म्हणूनच ते हिंदूंमध्ये विशेषतः शैवांमध्ये अत्यंत आदरणीय स्थान मानले जाते. पाण्याच्या टाकीच्या मधोमध बांधलेले हे सुंदर मंदिर पर्यटकांना आकर्षित करते.

खंडोबा मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशास्त्रात अंगभूत असलेले खंडोबा मंदिर हे बीड मधील सर्वात जास्त भेट दिलेल्या प्राचीन स्थळांपैकी एक आहे. महादजी सिंधी यांनी १८ व्या शतकामध्ये हे मंदिर बांधले होते. मंदिराची स्थापना निजामाने केली असेही मानले जाते.

रामेश्वर मंदिर

बीड जिल्ह्यामध्ये असणारे हे शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये सौताडा या ठिकाणी हे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.

हजरत शहेनशहावली दर्गा

हजरत शहेनशहावली चौदाव्या शतकातील चिस्ती या जमाती पासून सुफी होते ते मोहम्मद तुगलक च्या शासन काळात बीड येथे आले. त्यांची कबर आणि आसपासची परिसरात १३८५ ते १८४० च्या विविध काळात बांधण्यात आली. दरवर्षी एक इस्लामीक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी उरूस आयोजित केला जातो.

जामा मशीद

बीड हे भूतकाळामध्ये बहुतांश मुस्लिम शासकांच्या ताब्यात असल्याने आज अनेक मशिदी आणि इतर धार्मिक स्थळे याठिकाणी आहेत. ही जामा मशीद या शहरातील प्रमुख मशीदिंपैकी एक आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजा जहागीर ने ही बांधली होती.

बिंदुसरा

गोदावरी नदीची उपनदी असून तिचा उगम बालाघाट पर्वतरांगात होतो या जवळचे बिंदूसरा धरण देखील एक सुंदर पिकनिक स्पॉट बनते

कपिलधारा धबधबा

बीड चे नैसर्गिक आकर्षण वाढवणारे आणखी एक ठिकाण म्हणजे कपिलधारा धबधबा. खडकाळ भूप्रदेशातून सुमारे ५० फूट उंचीवरून खाली पडल्याने ऐतिहासिक लहान तलाव बनतो जिथे आपण स्नान करू शकतो.

सौताडा

रामेश्वर मंदिराच्या जवळच हे सौताडा झरा पहाव्यास मिळतो. पाटोदा तालुक्यापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा सौताडा झरा आहे. या ठिकाणी गार्डन सुद्धा तयार करण्यात आलेली आहे.

धारूर किल्ला

बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्वाचे शहर आहे. राष्ट्रकूटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्यात भर घालून त्यानंतर राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली.

खजाना विहीर

बीड जिल्हा शहरापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर खजाना बावडी ही विहीर आहे. ही विहीर ९९१ मध्ये निजामबादच्या सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधली. ही विहीर जमिनीपासून जवळपास २३ फूट खोल आहे. या विहिरीला ५ ते ६ फूट इतके पाणी असते. त्यामुळे परिसरातील सुमारे ६०० एकर जमिनीला या विहिरीचे पाणी पुरवले जाते.

नायगाव मयूर अभयारण्य

बीड शहरापासून २५ किलोमीटरच्या अंतरावर नायगाव या गावाच्या परिसरात हे अभयारण्य आहे १९९४ साली महाराष्ट्र शासनाने या अभयारण्याला मान्यता दिली.

मंदिराजवळील हॉटेल्स (HOTELS NEAR PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MANDIR)

भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, बीड जिल्ह्यामध्ये, परळी या ठिकाणी परळी वैजनाथाचे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराला लागूनच दोन यात्री निवास आहे, जे श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट द्वारे चालवले जातात २०० ते ३०० रुपये असे शुल्क आकारून या ठिकाणी सोय केली जाते. येणाऱ्या भाविकांना यात्री निवासामध्ये गरम पाणी, दूरदर्शन, शौचालय, त्याचप्रमाणे बेडची व्यवस्था व्यवस्थित केली जाते. या मंदिराच्या आजूबाजूला काही हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत.

  • हॉटेल आर्या एक्झिक्यूटिव्ह
  • हॉटेल साई पॅलेस
  • अग्रवाल लॉज
  • हॉटेल परिचय
  • हॉटेल अनुसया पॅलेस

प्रसिद्ध खाद्यपदार्थ

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यटनाच्या दृष्टीने जसे महत्त्व प्राप्त झालेले आहे, तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या खाद्य संस्कृतीमुळे सुद्धा या राज्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिभेचे चोचले पुरवणारे आणि प्रसिद्ध असणारे असे खाद्यपदार्थ आपल्यास पहावयास मिळतात. बीड जिल्ह्यामध्ये धारूर चा खवा आणि सीताफळे तसेच नेकनुर चा हुर आंबा प्रसिद्ध आहेत.

परळी वैजनाथ कथा (PARLI VAIJNATH JYOTIRLINGA STORY IN MARATHI)

परळी वैजनाथ शिव कथा – पुराण काळामध्ये एकदा लंकाधिपती रावण कैलास पर्वतावर जाऊन शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप करू लागला. ऊन, पाऊस, थंडी यांचा त्रास सोसूनही भगवान शंकर प्रसन्न झाले नाही. तेव्हा रावण आपले एक एक मस्तक कापून शंकराला अर्पण करू लागला. अशा प्रकारे त्यांनी आपली नऊ मस्तके शिवाला अर्पण केली. जेव्हा तो आपले दहावे शिर कापण्यास तत्पर झाला तेव्हा साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी रावणाची दहा ही डोकी पूर्ववत केली व रावणाला वर मागण्यास सांगितले.

रावणाने शिवाला सांगितले की, मी आपणास लंकेत घेऊन जाऊ इच्छितो. भगवान शंकराने रावणाची ही इच्छा मान्य केली. ते रावणाला म्हणाले, तू माझ्या या आत्मलिंगाला अवश्य लंकेत घेऊन जा पण लक्षात ठेव, जात असताना तू चुकून जरी आत्मलिंगाला वाटेत कुठे जमिनीवर ठेवलेस तर ते शिवलिंग त्याच जागी स्थिर होईल. रावण आनंदाने शिवलिंग घेऊन लंकेला निघाला. वाटेत त्याला लघु शंका झाली. पुढे गेल्यावर वाटेत त्याला एक गुराखी भेटला रावणाने त्याला विनंती केली व ते शिवलिंग त्याच्या हातात देऊन रावण लघुशंकेला गेला.

पण त्या गुराख्याला त्या शिवलिंगाचा भार सहन झाला नाही. त्यामुळे ते शिवलिंग त्याने खाली भूमीवर ठेवून दिले.ते तेथेच स्थिर झाले. पुढे जाऊन त्याचेच नाव वैद्यनाथेश्वर पडले. देवांना जेव्हा कळले की सध्या शिवशंकर रावणा जवळ राहत आहेत तेव्हा त्यांना अतिशय दुःख त्यांनी नारदाला विश्वासात घेतले. नारद रावणाकडे गेले व त्याच्या तपश्चर्येची प्रशंसा करून म्हणाले रावणा तू शंकरावर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली आहेस. शिवाचे शब्द खरे मानणे हे फार मोठी चूक आहे. आता तू असे कर, कैलास पर्वतावर जा आणि त्यांचे नुकसान करून आपले हीत साधून घे. यासाठी तू येथे जा व कैलास पर्वताला मुळापासून उपट.

कैलासाला उचलणे हेच तू आपल्या ध्येयात सफल झाल्याचे लक्षण असेल. रावण नारदाच्या बोलण्याला फसला व त्याने लगेच जाऊन तसे करायला सुरुवात केली. त्यामुळे रागावलेल्या भगवान शंकराने रावणाला शाप दिला की, तुझ्या अहंकाराचा नाश करणारी शक्ती लवकरच अविर्भुत होणार आहे. ही गोष्ट नारदाने देवांना जाऊन सांगितली. त्यामुळे देव आनंदी झाले. इकडे रावण आनंदात घरी आला. शिवाच्या मायेने त्याला ग्रासले होते. त्यामुळे आता सारे जग जिंकण्याच्या आशेने त्याला पछाडले होते. त्याच्या या अहंकाराचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना अवतार धारण करावा लागला.

पुढे या कथेनुसारच वैद्यनाथेश्वर या शिवलिंगाचे वैजनाथ असे नाव प्रसिद्ध झाले.

🙏पसायदान – एक विश्व प्रार्थना 🙏

परळी वैजनाथ मंत्र

ॐ नमः आराधे चात्रिरायच नमः शीघ्रयायच शीभ्यायच ।

ॐ नमः ऊम्यार्य चावस्वन्याय च नमो नादेयाय च द्विप्यायच ।।

या मंत्राद्वारे भगवान शंकराला दीपदान करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तसेच त्यांना प्रसन्न करून घ्यावे.

PARLI VAIJNATH JYOTIRLINGA TEMPLE official website👇

https://www.vaijnathjyotirling.com/

मंदिरामध्ये साजरे केले जाणारे उत्सव (FESTIVALS AT PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MANDIR)

गुढीपाडवा, विजयादशमी, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्र आणि वैकुंठ चतुर्थीला या मंदिरामध्ये मोठे उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवामध्ये तुळस आणि बेलपत्र यांच्यात कसलाही भेदभाव केला जात नाही. महादेवाला तुळशीपत्र आणि विष्णूला बिल्वपत्र अर्पण करण्याची आगळी पद्धत या मंदिरामध्ये चालते. वर्षभर नित्यपुजा मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने पार पाडली जाते.

वार्षिक उत्सव (YEARLY FESTIVALS – PARLI VAIJNATH JYOTIRLINGA MAHARASHTRA)

श्रावण महिना :

श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार पाचव्या महिन्यात येतो, जो जुलैच्या अखेरीस सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संपतो. श्रावण महिन्यात संपूर्ण परळी गाव रुद्र मंत्राच्या जयघोषाने दुमदुमून जाते. भगवान शंकराला आवडणाऱ्या पांढऱ्या फुलांची व बिल्व पत्राची लिंगावर आरास केली जाते. समई निरांजली लावून संपूर्ण श्रावण महिना तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

महाशिवरात्री

याच दिवशी भगवान शंकराचा देवी पार्वतीशी विवाह झाला. हा उत्सव फेब्रुवारीच्या शेवटी ते मार्चच्या सुरुवातीस होते.

विजयादशमी

दसरा म्हणूनही ओळखला जाणारा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवस साजरा केला जातो.

FAQ

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहे?

भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, बीड जिल्ह्यामध्ये, परळी या गावात परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे.

परळी वैजनाथ हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?

परळी वैजनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे.

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाला दर्शन करण्यासाठी किती प्रवेश शुल्क आहे?

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाला दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.

परळी वैजनाथाचे दुसरे नाव काय?

परळी वैजनाथचे दुसरे नाव परळी वैद्यनाथ असे आहे.

परळी वैजनाथ याचा जिर्णोद्धार कोणी केला?

परळी वैजनाथ चा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला.

परळी वैजनाथ हे मंदिर कोणत्या पर्वतावर आहे?

परळी वैजनाथ हे मंदिर मेरू पर्वतावर आहे.

निष्कर्ष

भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असणाऱ्या या मंदिराचा इतिहास आणि परळी वैजनाथ माहिती (परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर माहिती) आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. या मंदिराबाबतची माहिती आपल्याला कशी वाटली? तसेच काही चुका आढळल्यास आम्हाला त्या कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असेच नवनवीन विषय आणि माहिती घेऊन.

तोपर्यंत नमस्कार 🙏🙏

Leave a comment