नवरात्री संपूर्ण माहिती मराठी | Navratri Information In Marathi

नवरात्री संपूर्ण माहिती मराठी Navratri Information In Marathi – गणपती उत्सव आणि पितृपंधरवडा संपला म्हणजे आपल्याला वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्र हा हिंदू धर्मातील जनतेद्वारा साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण खोट्या, वाईट गोष्टींवरील सत्याचा विजय दर्शवतो. नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. या नवरात्रीचे महत्व, कथा, नवरात्र पूजा याबाबतची संपूर्ण माहिती आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. चल तर मग, पाहुयात नवरात्री.

Table of Contents

नवरात्री संपूर्ण माहिती मराठी | Navratri Information In Marathi

आपल्याला एक गोष्ट माहीत आहे का? घटस्थापनेचा संबंध हा थेट शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय. आपल्या शेतात आपण जी पिके पिकवतो, आणि ज्यातून आपले पोट भरते त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नवरात्र. नवरात्रीच्या दरम्याने शेतातील पिके तयार झालेली असतात तर काहींच्या पिकांची कापणी झालेली असते. आपल्या घरामध्ये नवीन धान्य आलेले असते. घटस्थापनेच्यावेळी घटासमोर आपण आपल्या शेतातील माती आणतो. त्या मातीमध्ये हे नवीन धान्य आपण पेरतो. दसऱ्यापर्यंत म्हणजे नऊ दिवसात ते धान्य त्या घटासमोर उगवते. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही आपल्याकडून पूजा केली जाते.

Navratri Information In Marathi

नवरात्र कधी साजरी केली जाते ?

हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून दोनदा साजरे केली जाते. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते. म्हणजेच पहिली नवरात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात साजरी केली जाते आणि ऑक्टोबरमध्ये दुसरी. नवरात्र नऊ दिवस सतत चालू असते. ज्यात देवीच्या विविध रूपांची लोक भक्तीने पूजा करतात. भारतातील नवरात्र वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरी केली जाते. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.

नवरात्र शब्दाचा अर्थ काय ?

नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे. ज्यामध्ये ‘नव’ म्हणजे नऊ दिवस आणि ‘रात्र’ म्हणजे रात्र.म्हणूनच या सणाला नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्री व्यतिरिक्त, नवरात्रोत्सवाला नवराते, नवरात्र, शारदीय नवरात्र यासारख्या नावांनी देखील ओळखले जाते. हा सण हिंदी महिन्यानुसार प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत साजरा केला जातो. नवरात्रीचा नववा दिवस महा नवमी म्हणूनही ओळखला जातो.

नवरात्रीची माहिती

आपल्या देशात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी, सर्व राज्यांत रामलीलाचे आयोजन केले जाते आणि दहाव्या दिवशी राम आणि रावणाचे युद्ध रंगवून रावणाचा वध केलेला दाखवला जातो. आणि रावणाला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मारल्याच्या आनंदात फटाके वगैरे फोडून मोठ्या धूमधडाक्याने हा सण साजरा केला जातो. नवरात्रीच्या सणात, काही लोक उपवास ठेवतात आणि ते फक्त पाणी पिऊन दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कडक पूजा करतात. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी देखील नवरात्रीसाठी संपूर्ण नऊ दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा, पूजा, आरती केली जाते. वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो. एका भांड्यामध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवला जातो. या घटात आंब्याची किंवा विड्याची पाने गोलाकार ठेवतात. त्यावर नारळ ठेवला जातो. देवीपुढे अखंड दिवा तेवत ठेवला जातो. समोर देवीचे ताट ठेवतात. त्याच्यापुढे ५ फळे ठेवली जाते. या घटाला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते.

👇या नवरात्रीच्या शुभसमयी आपल्या प्रियजनांसाठी 👇

🙏SPECIAL GIFT FOR YOUR LOVED ONE🙏

नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी आईला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवतात. मनोभावे देवीआईची उपासना आरती केली जाते. काही लोक नऊ दिवस अनवाणी राहतात. काही लोक निराहार उपवास करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते. काही घरात ललिता पंचमी तर काही घरात षष्ठीचा फुलोरा करतात. या मध्ये देवीच्या वर कडकण्या बांधतात.

नऊ दिवसानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा असे ही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे. असत्यावर सत्याच्या विजयचा प्रतीक आहे म्हणजे दसरा होय. या दिवशी आपट्याची पाने आणतात. आपट्याची पाने मित्र मंडळींना, गुरूंना, मोठ्या माणसांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात.या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन कामे हाती घेतली जातात. यादिवशी पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली जाते. सरस्वतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच यादिवशी व्यापारी, कामगार आपल्या शस्त्रात्रांची पूजा करतात. अशाप्रकारे हा नवरात्रीचा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नवरात्रीमध्ये पूजलेल्या सर्व देवींमध्ये, कालीमातेच्या रूपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आपण नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांसाठी पर्स, बेल्ट, शूज इत्यादी चामड्याच्या वस्तू वापरत नाहीत. नवरात्रीमध्ये नऊ दिवस मातेच्या विविध रूपांची पूजा केल्याने आपल्याला देविमातेचा आशीर्वाद म्हणून एक नवीन ऊर्जा मिळते. जेणेकरून सत्कर्माच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढतो.

नवरात्रीमागील इतिहास

  • शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीच फळ म्हणून रामांनी ९ प्रकारची भक्ती दिली. त्यात हरिकथा, संतमिलन, ध्यास, आचरण, हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. त्यात नवदा भक्ती म्हणून एक भक्ती आहे, तिलाच नवरात्री असे म्हणतात.
  • रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारद मुनींनी श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामांनी लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाचा वध केला.
  • महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे ९ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले. त्यानंतर तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो.

नवरात्रीचे महत्त्व

नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या वाढलेल्या देवीतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी नवरात्री साजरी करण्याला महत्व प्राप्त होते. नवरात्रीच्या काळात देवीची मनोभावे पूजा अर्चा, ध्यानधारणा करावी आणि ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. कारण सगळ्या देवी ह्या दुर्गादेवीच्या अवतार आहेत. या काळात दिवसभरात श्री दुर्गादेवीला प्रार्थना करावी, ‘हे श्री दुर्गादेवी, नवरात्रोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्रपटींनी कार्यरत असलेल्या तुझ्या देवीतत्त्वाचा तुझ्या कृपेने अधिकाधिक लाभ होऊ दे.’

अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी

सार्वजनिक नवरात्र

नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळात गरब्याचे आयोजन केले जाते. सोसायटींमध्ये बायका भोंडल्याचे आयोजन करतात. या मध्ये एका पाटावर हत्ती काढून त्याच्या अवती भवती फेर धरला जातो.आणि भोंडल्याची गाणी म्हणतात. बायका आपापल्या घरून खाण्याच्या वस्तू आणतात आणि त्या ओळखायच्या असतात.त्याला खिरापत असे म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीआईच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते.बायका देवीआईची खणा नारळाने ओटी भरतात. काही देवीआईचे भक्त घरोघरी जाऊन जोगवा मागतात.

नवरात्रीतील देवीची नऊ रूपे

१. देवी शैलपुत्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाचे पूजन केले जाते. पर्वतांचे राजा हिमालय यांच्या घरी दुर्गा देवीने जन्म घेतला आणि शैलची कन्या झाल्या. म्हणून या देवीला शैलपुत्री असे म्हणतात. ह्या अवतारामध्ये देवी वृषभावर बसलेल्या आहेत. आणि देवीच्या एका हातामध्ये कमळाचे फुल व दुसऱ्या हातामध्ये त्रिशुल धरलेला आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते अशी धारणा आहे.

२. ब्रह्मचारिणी

दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी अवताराचे पूजन केले जाते. देवीने बरीच हजार वर्षे शिव-शंकराचे ध्यान केले होते. आणि देवीची ही तपश्चर्या बघून स्वतः ब्रम्हदेवाने येऊन देवीला वरदान दिले. व म्हणाले अशी घोर, कठीण तपश्चर्या आजपर्यंत कुणीच केलेली नाही. म्हणून ब्रम्हदेवाने देवीवर प्रसन्न होऊन देवीला ब्रम्हचारीणी असे नाव दिले. ह्या अवतारात देवीने एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात जपमाळा धरलेली आहे. देवीच्या ह्या रूपाचे मनोभावे पूजा केल्यास दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते.

३. चंद्रघंटा

देवीच्या कपाळावर चंद्रकोर आहे, म्हणून देवीला चंद्रघंटा म्हणतात. तिसऱ्या दिवशी देवीचे चंद्रघंटा अवताराचे पूजन केले जाते. म्हणजेच देवीच्या उग्र अवताराचे पूजन जाते.

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

४. कूष्मांडी

देवीच्या कुष्मांडी अवताराला चौथ्या दिवशी पूजले जाते. आणि मनोभावे पूजन केल्याने भक्तांना देवी प्रसन्न होते असे ही सांगितले जाते. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात असेही मानले जाते. देवीच्या ह्याच अवतारामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती, म्हणून ह्या देवीच्या अवताराला कुष्मांडी असे म्हटले जाते.

५. स्कंदमाता

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप म्हणजे देवीचा पाचवा अवतार आहे. सगळ्या देवतांमध्ये ह्या देवीचे रूप खूप वेगळे आहे. भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेले असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास भक्तांचे सर्व पापा पासून मुक्ती होते. असे मानले जाते.

६. कात्यायनी

कात्यायनी नावाचे एक ऋषीमुनी होते. त्यांनी कठीण तपश्चर्या केली होती. त्यांच्या या तपश्चर्येमुळे देवी दुर्गाचा त्या ऋषीमुनींच्या घरी जन्म झाला होता. म्हणून देवीच्या ह्या अवताराला कात्यायनी नाव दिलेले आहे. देवीच्या कात्यायनी अवताराचे सहाव्या दिवशी पूजन केले जाते. देवीचे हे रूप दृष्टांचा नाश करणारे असून या देवीचे वाहन सिंह आहे.

७. कालरात्री

देवीचे हे रूप काळ्या रात्रीसारखे आहे आणि देवीच्या शरीराचा रंग काळा असल्याने तिला हे नाव मिळाले. दुर्गा देवीचे कालरात्री हे सातवे रूप आहे. तिचे हे रूप खूप भीतीदायक असले तरी देवी शुभदायनी आहे. म्हणून देवीला शुभंकारी असेही म्हटले जाते. या देवीकडे जे वरदान मागाल ते पूर्ण होते व भक्तांचे भाग्य उजळते. ह्या देवीचे वाहन गाढव आहे.

गौरी आवाहन पूजा माहिती मराठी

८. महागौरी

महागौरी अवतारात देवीचे आठवे रूप आहे. ही कुमारिका अवस्थेत असल्याने आठव्या दिवशी कुमारिकांचे देखील पूजन केले जाते. ही देवी पांढऱ्या बैलावर बसलेली असून सर्व कपडे पांढरे परिधान केलेले असून देवीचे मुखमंडल चंद्रासारखे शीतल आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते.

९. सिध्दिदात्री

ही कमळ पुष्पावर विराजमान झालेली देवी आहे. देवीचा हा नववा अवतार आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास कुणीही दुःखी राहत नाही.

नवरात्रीचे धार्मिक महत्व

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।

प्राचीन काळापासूनच नवरात्री साजरी केली जाते. देवी हि परमात्म्याचेच स्वरूप आहे. पूर्वीच्या काळी नवरात्री साजरी करतांना त्यात मूर्ती नसायची. नाच गाणी सुद्धा नव्हती. परंतु हल्ली देवीच्या मोठ्या मोठ्या मूर्ती बसवल्या जातात. तसेच गरबा, भोंडला यासारखे नाच गाण्याचे कार्यक्रम देखील सगळीकडे पाहायला मिळतात. ९ दिवस जे नवरात्रीचे उत्सव आपण साजरे करतो त्यातून आपल्याला सुख, समाधान, शांती, परमानंद मिळतो. यामुळे घरामधील कलह नष्ट होतात. सामाजिक एकोपा निर्माण होतो.

नवरात्रीचे धार्मिक महत्व

नवरात्रीचा उपवास कसा करावा?

उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे याचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो. उपवासामुळे पचनसंस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. आठवड्यातुन एकदा उपवास करणे म्हणजे शरीराचे शुद्धीकरण करण्यासारखे आहे. आपण रोज जे अन्न-धान्य खातो, त्याच्या सततच्या वापराने, धान्याच्या पुरवठ्यावर ताण पडतो. तो ताण कमी करण्यासाठी उपवास केले जातात.

उपवास म्हणजेच कुणाच्या तरी जवळ असणे, विश्वास ठेवणे, म्हणजे काहीतरी संकल्प घेणे, काही चुकीचे काम करणार नाही, ९ दिवस काहीच खाणार नाही, फक्त देवीच्या सानिध्यात राहील, तिची आराधना करेल, तिच्या छत्रछायेखाली राहील आणि तिच्याच मंत्रांचा जप करेल तसेच तिच्या नियमांचे पालन करून फक्त ९ दिवस नाही तर सम्पूर्ण जीवन ते आचरणात आणेन. याचसाठी उपवास करतात . आणि अखंड व्रत करतात .

प्राचीन काळात खुप मोठे यज्ञ व्हायचे, अखंड ९ दिवस ते यज्ञ सुरु असायचे. त्यात खुप प्रकारच्या जडीबुटी असायच्या, औषधी असायच्या आणि शरद ऋतू पासून वाचण्यासाठी ऋषीमुनी त्या यज्ञातूनच ऊर्जा घेत असत. असे केल्याने ते आजारी पडत नव्हते. सगळीकडे सकारात्मकता पसरावी म्हणून यज्ञ केले जायचे. यज्ञ सुरु असल्याने देवीचे नामस्मरण होत असे, आणि मंत्रउच्चार सुरु राहत असे.

नवरात्रीचा उपवास का करतात?

चैत्र नवरात्री असो व शारदीय नवरात्री असो दोघांमध्ये उपवास करायचा असतो .त्या मागे कारण असे आहे कि, जेव्हा ह्या दोघी नवरात्रीत येतात तेव्हा प्रकृति मध्ये खूप मोठा बदल घडत असतो. त्यामुळे रोगराई पसरत असते. त्यामुळे आपले शरीर हे आजारांचे घर सुद्धा बनु शकते. म्हणून त्या वेळेस आपण आपल्या शरीराला हलके ठेवायचे असते .

हलके फुलके खायचे असते. जे सहज पचेल असे खायचे असते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी नवरात्रीमध्ये अखण्ड यज्ञ करायचे. त्या यज्ञामध्ये बऱ्याच प्रकारची औषधी गुणधर्म असलेली जडीबुटी सुद्धा वापरायचे. त्याच्या वासाने, धुराने आजूबाजूची प्रकृती हि शुद्ध होऊन त्यातील विषाणू ,जंतू नष्ट होऊन शुद्ध वातावरण निर्माण होत असे. यामुळे त्यांचे शरीर त्या आजारांपासून, रोगांपासून वाचू शकत होते. त्यांच्या ह्या ज्ञानामुळे आपल्याला निरोगी आयुष्य, निरोगी शरीर राहते. म्हणून ह्या नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायचा असतो.

नवरात्रीचे नऊ रंग 2023

नवरात्रीचे नऊ रंग

१५ ऑक्टोबर, दिवस पहिला, आणि रंग पांढरा

महत्त्व :- कोणत्याही नवीन किंवा शुभ कार्याची किंवा नव्या गोष्टीची सुरुवात हि निरागसता, निर्मळ आणि स्वच्छतेने केली जाते. तसेच पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. तसेच पांढरा रंग हा शांतता, निखळपणा, साधेपणा याचे प्रतिनिधीत्व करतो. आणि सत्य स्पष्टवक्तेपणा हि दर्शिवला जातो. तसेच नवरात्रीमधील पहिली देवी ‘शैलपुत्री’ ह्या देवीला देखील पांढरा रंग खुप प्रिय आहे. म्हणून नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी ह्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

१६ ऑक्टोबर, दिवस दुसरा, आणि रंग लाल

महत्त्व :- हिंदू धर्मात लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक समजले जाते, तसेच लाल रंग हा ऊर्जा, लक्ष आकर्षित करणारा आहे. तसेच हा रंग सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, धैर्य, संघर्ष,उत्साह वाढवतो. त्याच बरोबर लाल रंग मुळे मेंदूस उत्तेजना मिळते. आणि दुसऱ्या अवताराची “देवी ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग हा लाल आहे. हा रंग शक्ती प्रदान करतो. म्हणून नवरात्री मध्ये दुसऱ्या दिवशी ह्या लाल रंगाचे कपडे परिधान करण्यास खूप महत्व दिले जाते .

१७ ऑक्टोबर, दिवस तिसरा, आणि रंग निळा

महत्त्व :- ह्या रंगात सत्यता, शांतीचा, श्रद्धाळू आणि उदार, विश्वासूपणाचे वैशिष्ट्य ह्या निळ्या रंगात आहे. तसेच हा रंग समुद्र आणि आकाशाची अमर्यादा व खोली यांची सांगता करतो. देवीचा तिसरा अवतार म्हणजेच ‘देवी चंद्रघंटा’ ह्या देवीचा हा निळा रंग खूप आवडता रंग आहे. म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान केले जाते.

सर्वपित्री अमावस्या संपूर्ण माहिती मराठी

१८ ऑक्टोबर, दिवस चौथा, आणि रंग पिवळा

महत्त्व :- पिवळा रंग आत्मविश्‍वास वाढवणारा आहे. मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा आहे. रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग, असून तो ऊर्जेशी संबंधित आहे. तसेच मानसशास्त्राच्या नजरेतून बघितले तर आपली मानसिक शक्ती तसेच डाव्या मेंदूस सक्रिय करतो. हा रंग ज्यांना आवडतो त्यांची बुद्धी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. ते वैयक्तिकरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. देवीचा चौथा अवतार म्हणजेच कूष्मांडी देवीचा आवडता रंग हा पिवळा आहे. म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

१९ ऑक्टोबर, दिवस पाचवा, आणि रंग हिरवा

महत्त्व :- हिरवा रंगाचे महत्व हे आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांतता, समृद्धी हा रंग देतो. तसेच आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग, प्रगती, भरभराट, सहनशक्ती आर्थिक घडामोडी, त्याच बरोबर हा रंग प्रकृती, म्हणजेच निसर्गाचा विकास यांचे प्रतिनिधीत्व करतो. देवीचा पाचवा अवतार म्हणजेच ” आई स्कंदमाता ” देवीचा आवडता रंग हा हिरवा आहे. म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात .

२० ऑक्टोबर, दिवस सहावा, आणि रंग करडा

महत्त्व :- हा रंग आत्मविश्वास दर्शवितो, तसेच हा रंग काळा आणि पांढरा या दोन्ही रंगापासून बनविला जातो. रंगाचे गुणधर्म हे विरोधी असून ते दोन्ही गुणधर्म ह्या करड्या रंगाद्वारे एकत्रित येतात. देवीचा सहावा अवतार म्हणजेच ” कात्यायनी “ ह्या देवीचा आवडता रंग हा करडा आहे. म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करड्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

२१ ऑक्टोबर, दिवस सातवा, आणि रंग नारंगी

महत्त्व :- हा रंग वैराग्याचा रंग आहे. ज्याप्रमाणे भक्तीमध्ये ऋषीमुनी मोहभंग होतात आणि भ्रम आणि मोहापासून दूर जातात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात. त्याच प्रमाणे नवरात्री मध्ये आपल्यासारख्या साधारण मानवाने सुद्धा भक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि मनोभावे देवीची आराधना करत असतांना मनात कुठलाही लोभ, मोह येऊ नये यासाठी ह्या नारंगी रंगाचे खूप महत्व आहे .देवीचा सातवा अवतार म्हणजेच ” कालरात्री ” ह्या देवीचा आवडता रंग हा नारंगी आहे. म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

२२ ऑक्टोबर, दिवस आठवा, आणि रंग मोरपंखी

महत्त्व :- डोळ्यांना प्रसन्न वाटणाऱ्या मोरपंखी रंगात निळ्या रंगातली सत्यता , शांती, विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, श्रद्धाळूपणा आणि सचोटी दर्शविते आणि हिरव्या रंगातली सृजनता, आरोग्यसंपन्नता निसर्गाचा रंग, प्रगती, भरभराट, सहनशक्ती आणि नावीन्य आढळत असल्याने सौंदर्या शास्त्रानुसार तो एक परिपूर्ण रंग आहे. देवीचा आठवा अवतार म्हणजेच ” महागौरी “ ह्या देवीचा आवडता रंग हा मोरपंखी आहे. म्हणून नवरात्रीच्या आठव्या दिवशी मोरपंखी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

२३ ऑक्टोबर, दिवस नऊ, आणि रंग गुलाबी

महत्त्व :- गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर काही लोकांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य आहे अस जाणवते , तसेच महत्वाकांक्षा, दृढ़ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. देवीचा नौवा अवतार म्हणजेच ” सिध्दिदात्री “ ह्या देवीचा आवडता रंग हा गुलाबी आहे. म्हणून नवरात्रीच्या नऊ व्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योतिबाबत महत्वपूर्ण गोष्टी

  • अखंड ज्योत संपूर्ण नऊ दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे.
  • नवरात्रीमध्ये देवी दुर्गासमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते.
  • देवीसमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
  • मंत्र महोदधि नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।
    याचा अर्थ तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.
  • अखंड दिव्याची ज्योत ठीक करताना विझली तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.
नवरात्री

नवरात्री उत्सव पूजन

नऊ दिवस घटाजवळ दिवा तेवत ठेवतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती केली जाते. पूजेसाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो. सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणजे देवी दुर्गा मंत्र म्हणून देवांना फुले व प्रसाद अर्पण केला जातो. या उत्सवात दररोज देवीला ताजे हार आणि फुले दान केली जातात. घटासाठी नऊ दिवस वेगवेगळया फुलांच्या माळा घातल्या जातात.

शारदीय नवरात्री 2023 शुभ मुहूर्त

१५ ऑक्टोबर २०२३
घटस्थापना शुभ मुहूर्त सुरू सकाळी ११.४४ मिनिटांनी
घटस्थापना शुभ मुहूर्त समाप्त दुपारी १२.३० मिनिटांपर्यंत

२४ ऑक्टोबर२०२३ विजयादशमी (दसरा)

शारदीय नवरात्रीची देवीची ओटी

देवीला या नऊ दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेऊन हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी. देवीकडून आपल्याला अधिकाधिका उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून, तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहचविण्याचे काम करतात. म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो.

नवरात्र पूजाविधी

नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात. तर देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते. तसेच फुलांची माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते. आणि पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. यावेळी कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते.

तर सकाळी संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. नऊ दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात.

नवरात्रीतील नऊ माळा व फुले

पहिली माळ
शेवंती किंवा सोनचाफा यासारख्या पिवळ्या फुलांची

दुसरी माळ
चमेली, मोगरा, अनंत किंवा तगर सारख्या पांढऱ्या फुलांची

तिसरी माळ
कृष्णकमळ किंवा गोकर्णा सारख्या निळ्या फुलांची

चौथी माळ
केशरी किंवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले

पाचवी माळ
या दिवशी देवीला बेल किंवा कुंकवाची माळ

सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ

सातवी माळ
झेंडू किंवा नारंगीची फुले

आठवी माळ
तांबडी फुले (जास्वंद, कमळ, कण्हेर किंवा गुलाब )

नववी माळ
या दिवशी कुंकुमार्चन करतात

नवरात्री घट माळ

पहिली माळ (गुरुवार)- विड्याची पाने
दुसरी माळ (शुक्रवार)-बेल, धोतरा रुई
तिसरी माळ (शनिवार)-दूर्वा, झेंडू
चौथी माळ (रविवार) -मोगरा, जाई, जुई
पाचवी माळ (सोमवार) -तुळशी
सहावी माळ (मंगळवार)-गुलाब, कमळ
सातवी माळ (बुधवार )-शेवंती, कृष्ण कमळ
आठवी माळ (गुरूवार) -लाल जास्वंद
नववी माळ (शुक्रवार)-लिंबूू

नवरात्रीत नैवेद्य कोणता द्यावा ?

सोमवार – गायीचे तूप
मंगळवारी – केळी
बुधवारी – लोणी
गुरुवारी – खडीसाखर
शुक्रवारी – साखर
शनिवारी – गाईचे तूप
रविवारी – पायस म्हणजेच खीर

याबरोबरच नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनक स्तोत्र, राम रक्षा, देव्यपराध स्तोत्र, श्रीसूक्त, शालिनीदुर्गासुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण केले पाहिजे.

नवरात्री भारतात कुठे कुठे साजरी करतात?

  • उत्तर भारतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ९ मुलींना देवी म्हणून बोलावले जाते आणि त्यांना खायला घालतात आणि आशीर्वाद देतात.
  • बिहारच्या काही भागात या दिवसात जत्रा भरली जाते.
  • तेलंगनामध्ये स्त्रिया नवरात्री देवी साठी कलात्मक फुलांच्या सजावट तयार करतात.
  • गुजरातमध्ये नवरात्री हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. संपूर्ण जगभर दांडिया, गरबा नृत्यासाठी गुजरातचा नवरात्री उत्सव प्रसिद्ध आहे.गुजरातचे लोक माँ दुर्गाच्या पंडालाला सजवतात आणि त्यात माँ दुर्गाची मूर्ती बसवतात आणि संपूर्ण नऊ दिवस भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतात. यासह, ते गरबा नृत्य आणि दांडिया आयोजित करून संपूर्ण नवरात्रोत्सव साजरा करतात.
  • उत्तर भारतातील नवरात्री उत्सवांमध्ये रामायनातील कथांवर कलाकार रामलीला सादर करतात. प्रेक्षक देखील या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊ शकतात. दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. दुर्गादेवीचा विजय उत्तर भारताच्या सर्व राज्यात साजरा केला जातो. आणि कुटुंबे घरी एक दिवा लावतात जो सर्व नऊ दिवस अखंडितपणे चालू असतो.
  • कर्नाटकात हिंदू मंदिरे नवरात्रीच्या काळात रोषणाईने आकर्षित दिसतात. कर्नाटकात दसरा हा एक लोकप्रिय उत्सव आहे आणि यात शाही मिरवणुका काढल्या जातात.
  • गोव्यात नवरात्री हा सण मखरोत्सव या नावाने साजरा केला जातो. उत्सवाची शेवटची रात्र मखर आरती असते आणि या दिवशी भाविकांची खूप गर्दी होते.
  • तामिळनाडूमध्ये या दिवशी देव, देवता, ग्रामीण जीवन आणि प्राणी यांचे वर्णन करणाऱ्या बाहुल्यांचे प्रदर्शन ठेवले जाते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मित्र आणि कुटुंबे एकमेकांना भेट देतात.
  • महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये घटस्थापना म्हुणुन देखील हा उत्सव साजरा केला जातो. समृद्धीचे प्रतीक म्हणून नऊ रात्री एक दिवा अखंड तेवत देखील ठेवला जातो.
  • बंगालमध्ये नवरात्रोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बंगालचे लोक, नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केल्यानंतर, तिची मूर्ती किंवा मूर्ती पाण्यात तरंगून सण साजरा करतात.
  • केरळमध्ये यावेळी पुस्तकांची पूजा केली जाते. विजयाचा शेवटचा दिवस, ज्याला विजया दशमी असेही म्हटले जाते, या दिवशी मुलाला प्रथम वाचन / लेखन शिकवण्यास सुरुवात केली जाते.

भारताबाहेर नवरात्री उत्सव कुठे साजरा करतात ?

नेपाळमध्ये सुद्धा नवरात्री उत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात, कुटुंबे एकत्र येतात, वडीलधारे लोक आणि तरुण यांच्यातील बंधनाचा सन्मान करतात.

उत्तर आणि पश्चिम राज्ये या प्रदेशात नवरात्रीला रामलीला किंवा दसरा म्हणून संबोधले जाते. रामायनामध्ये सूचित केल्याप्रमाणे हे राक्षस राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक आहे.

नवरात्र उपास असताना काय जेवण करावे?

नवरात्रीत, खाण्यापिण्याचे बरेच काही नियम आहेत. नवरात्रीच्या वेळी, केळी, रताळे इत्यादींपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतात, तसेच इतर फळे, जूस सुद्धा पिऊ शकता. काही लोकांना उपवासाचा त्रास होत असेल तर आपण लिंबू पाणी, फळे किंवा नारळाचे पाणी घेऊ शकता.

नवरात्री सणाचा संदेश

९ दिवस श्री रामाने रावणाविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला. तसेच आई दुर्गाने माहिशासुराच्या दुष्कृत्याचा अंत करून लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले. म्हणूनच, हा उत्सव संपूर्ण जगाच्या आनंद आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो. नवरात्रीचा सण आपल्याला हे शिकण्यास प्रवृत्त करतो की कितीही वाईट शक्ति असल्या तरी चांगल्याचा विजय होतो. भले त्याला थोडा वेळ लागेल पण वाईटाचा कधीच विजय होत नाही. नवरात्रीचा पवित्र सण आपल्याला हा संदेश देतो की, आपण आपल्या शक्तीचा कधीही अहंकार करू नये कारण ज्याप्रमाणे महिषासुराच्या अहंकाराने त्याचा नाश झाला, त्याचप्रमाणे अहंकार आपल्याला नेहमीच नष्ट करण्यास प्रवृत्त करतो.

प्रश्न

नवरात्र ९ दिवस का साजरी केली जाते?

सलग नऊ दिवस देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यात चाललेल्या युद्धात, दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. आणि तेव्हापासून हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

यावर्षी २०२३ नवरात्री कधी आहे?

यावर्षी २०२३ नवरात्री १५ ऑक्टोबरला सुरू होत असून, २४ ऑक्टोबरला दसरा आहे.

नवरात्र किती आहेत?

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते. दुसरे नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथे नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते.

नवरात्रीचे काय महत्व आहे?

९ दिवस जे नवरात्रीचे उत्सव आपण साजरे करतो त्यातून आपल्याला सुख, समाधान, शांती, परमानंद मिळतो. यामुळे घरामधील कलह नष्ट होतात. सामाजिक एकोपा निर्माण होतो.

नवरात्री उत्सव कसा साजरा करतात?

नऊ दिवस घटाजवळ दिवा तेवत ठेवतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती केली जाते. पूजेसाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो. सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणजे देवी दुर्गा मंत्र. देवांना फुले व प्रसाद अर्पण केला जातो. या उत्सवात दररोज देवीला ताजे हार आणि फुले दान केली जातात. घटासाठी नऊ दिवस वेगवेगळया फुलांच्या माळा घातल्या जातात.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे नवरात्री या सणाबद्दल माहिती, महत्व आणि पूजा विधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

1 thought on “नवरात्री संपूर्ण माहिती मराठी | Navratri Information In Marathi”

Leave a comment